Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 August, 2010

धनवंत उमेदवारांना लगाम घालण्यावर उहापोह होणार

आजपासून पणजीत पश्चिम क्षेत्र परिषद
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - निवडणूक काळात उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. तसेच मतदारांना पैशांची आमिषे दाखवली जातात. या समस्यांना सामोरे जाणे आणि
त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी गोव्यात पश्चिम क्षेत्राची उद्यापासून (सोमवारपासून) दोन दिवसीय परिषद "मॅकनिज' पॅलेस येथे आयोजिण्यात आली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त डॉ. एस वाय. कुरेशी व आयुक्त इ एस. संपत यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होईल.
या परिषदेत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, दादर व नगर हवेली, दमण व दीव तसेच मध्यप्रदेशचे निवडणूक आयुक्त, १८ जिल्हाधिकारी व ७ जिल्हा पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती आज राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे निवडणूक आयुक्त गणेश कोयू उपस्थित होते.
या परिषदेत, निवडणूक आयोजनावेळी व निवडणुकीच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. प्रामुख्याने, उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पैशांच्या वापरावर अंकुश आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबतही ऊहापोह केला जाईल. यात विविध राज्यांतील निवडणूक कार्यालयांचे व अन्य प्रशासकीय अधिकारीही सहभागी होणार आहेत.
परिषदेच्या आरंभी "भारत आणि निवडणुका' या विषयावर भरवल्या जणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कुरेशी यांच्या हस्ते होईल. भारतातील लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या निवडणुकांना ६० वर्षे पूर्ण झाल्याने हे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या अनुषंगाने गेल्या ६० वर्षातील दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. दिल्लीत या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले होते व त्यानंतर अनेक राज्यांमध्ये हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यातील गोवा हे तेरावे राज्य ठरले आहे.
बदलत्या काळानुसार निवडणुकांच्या आयोजनासाठी एक उत्तम आराखडा तयार करणे हा या परिषदेमागील उद्देश आहे. निवडणुका सुरळीत होण्यासाठी विविध राज्यांतील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कोणती महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचेही सादरीकरण यावेळी होणार आहे. त्यामुळे याचाही फायदा अन्य राज्यांना होईल, असे मत श्री. राऊत यांनी व्यक्त केले.

No comments: