Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 January, 2010

ज्योती बसू कालवश

कोलकाता, दि. १७ - प्रदीर्घ काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ माकप नेते ज्योती बसू यांची प्राणज्योत रविवारी मालवली. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोलकाता येथील इस्तितळात मृत्यूशी झुंजत होते. आज सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोलकाता येथील एमएमआरआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या बसूंची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून खूपच खालावली होती. ९५ वर्षांचे वय व ' मल्टीऑर्गन फेल्युअर ' पाहता कुणी चमत्काराची अपेक्षा ठेवू नये , असे डॉक्टरांनी आधीच सांगितले होते. एवढेच नव्हे तर बसू यांच्या कुटुंबीयांना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्यांना डॉक्टरांनी इस्पितळात बोलावून घेतले होते. अखेर आज सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी बसू यांनी या जगाचा निरोप घेतला.
सलग २३ वर्षे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम ज्योती बसू यांनी केला. १९७७ ते २००० या काळात ते प. बंगालचे मुख्यमंत्री होते. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान त्यांच्याच नावावर आहे. १९९६ मध्ये ज्योती बसू यांना देशाचे पंतप्रधानपद बनण्याची संधी चालून आली होती. परंतु सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय माकपने घेतल्याने बसू यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली. २००८ साली सीपीएम पॉलिट ब्युरोमधून बसू यांना विश्रांती देण्यात आली होती. विशेष निमंत्रित म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
ज्योती बसू यांच्या निधनाने देशाने एक थोर राजकारणी नेता गमावला आहे, अशी संवेदना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केली आहे. बसू हे आपल्या राजकीय कौशल्य आणि कलागुणांमुळेच देशात सर्वाधिक काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहू शकले. आपल्या प्रदीर्घ अशा मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जनतेचा खरा सेवक, कुशल प्रशासक आणि थोर राजकारणी नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. मुख्यमंत्रिपद त्यागल्यानंतरही त्यांची प्रतिमा कायम होती. त्यांच्या निधनाने देशाने एक दिग्गज लोकनेता गमावला आहे, अशी संवेदना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उपराष्ट्रपती अन्सारी
बसू यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणे कठीण आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी संवेदना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आणि पश्चिम बंगालच्या विकासात बसू यांचे योगदान अविस्मरणीय राहील. बसू हे अनेकांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते, असे अन्सारी यांनी म्हटले आहे.
एक अध्याय संपला : पंतप्रधान
ज्योती बसू यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक प्रदीर्घ अध्याय संपला, अशा शब्दात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. बसू हे धर्मनिरपेक्ष मूल्यांची बांधिलकी जपणारे थोर नेते होते. राष्ट्रीय राजकारणात आपल्या प्रादेशिक अस्मितेचा बुलंद आवाज होते. अनेक विषयांवर मी त्यांचा सल्ला घेत असे आणि त्यांचा प्रतिसाद नेहमी सकारात्मक असायचा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
बसू हे खरे जननायक : चटर्जी
ज्योती बसू यांच्या निधनाने मी दुसऱ्यांदा आपल्या वडिलांना गमावले आहे, अशा शब्दात लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. बसू हे खरे जननायक होते. ते सतत म्हणायच, जनतेपासून दूर जाऊ नका. तुम्ही जर जनतेपासून दूर गेले तर मग राजकारणात काहीही शिल्लक उरणार नाही. आम्हाला आज त्याची जाणीव होत आहे. बसू यांना केवळ त्यांचाच पक्ष नव्हे तर समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला होता. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही.
बसू हे महान सुपुत्र : चिदंबरम
ज्योती बसू हे भारताचे महान सुपुत्र होते, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. ९६ वर्षीय बसू यांनी कित्येक दशकांपर्यंत आपल्या राजकारणाची छाप सोडली. ते एक महान योद्धा, लोकशाहीवादी आणि संसदपटू आणि देशासाठी प्रेरणास्थान होते. बसू यांनी तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय दु:खद आहे. त्यांची स्मृती आमच्या मन:पटलावर सतत कायम राहील. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.
बसू हे महान नेते होते : अडवाणी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अध्वर्यू ज्योती बसू हे महान नेते होते, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. ते दिग्गज होते. महान नेते होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रदीर्घ काळपर्यंत माकपाचा किल्ला अभेद्य राखला, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीला धक्का बसला आहे. बसू हे ई. एम. एस. नंबुद्रीपाद, भूपेश गुप्ता, इंद्रजीत गुप्ता यांच्या रांगेत बसणारे नेते होते. आमचे वैचारिक मतभेद असतील, पण त्यांच्या महानतेला मी वंदन करतो. मी स्वत: त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार आहे, असे अडवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपानेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली यांनीही बसू यांच्या निधनाद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
नितीन गडकरी
ज्योती बसू यांच्या निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. ज्योती बसू हे आधुनिक भारतातील सर्वोच्च उंची गाठलेले एक दिग्गज नेते होते. समाजातील कमकुवत आणि तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी झटणे, हीच त्यांची बांधिलकी होती. ते आपली विचारधघर आणि मूल्यांवर अतिशय ठाम होते. आपली स्वच्छ प्रतिमा आणि विश्वासाच्या बळावरच त्यांनी प्रदीर्घ अशा राजकीय जीवनात आपल्या कार्याची छाप पाडली. कम्युनिस्ट पक्षाच्या या दिग्गज नेत्याच्या निधनाबद्दल भाजपा अतीव दु:ख व्यक्त करीत असल्याची संवेदना गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
ममता बॅनर्जी
माकपाचे ज्येष्ठ नेते ज्याती बसू हे "डाव्या आघाडीच्या सरकारचे प्रथम आणि शेवटचा अध्याय होते' अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझे आणि बसू यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्हाला त्यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. बसू हे अतिशय थोर असे नेते होते. प. बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार स्थापण्याचे श्रेय फक्त त्यांनाच आहे. ते आणखी काही काळ जगले असते तर मला खूपच समाधान लाभले असते, असे ममता म्हणाल्या.
डाव्या आघाडीची मोठी हानी
ज्योती बसू यांच्या निधनामुळे डाव्या आघाडीची कधीही भरून न निाणारी हानी झाली आहे, आ शब्दात डाव्या आघाडीच्या नेत्यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे.
बसू हे सर्वोच्च उंची गाठलेले नेते होते, अशी संवेदना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव ए. बी. बर्धन यांनी म्हटले आहे. तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी झटणारा नेता आज आम्हाला सोडून गेला आहे. ते आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत झटले. त्यांचे जाणे आमच्यासाठी अतीव दु:खदायक आहे, असे बर्धन म्हणाले.
बसू यांच्या निधनामुळे डाव्या आघाडीची प्रचंड अशी कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशी संवेदना फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव देवव्रत बिस्वास यांनी व्यक्त केली आहे. आधुनिक बंगालचा शिल्पकार आणि देशात डाव्या आघाडीचया चळवळीला बळ देणारा महान नेता म्हणून देश त्यांची सतत आठवण करेल, असे बिस्वास यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बसू यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच ग्रामीण बंगालचा चेहरामोहरा बदलला आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली, असे निवेदनात म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्राचीही आदरांजली
माजी मुख्यमंत्री आणि क्रीडाप्रेमी ज्योती बसू यांच्या निधनाबद्दल कोलकात्यातील क्रीडा क्षेत्रानेही आदरांजली अर्पण केली आहे. कोलकाता शहरातील क्रीडा विकासाच्या योगदान बसू यांचे भरीव योगदान असल्याची प्रतिक्रिया भारतीय व बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि माजी दिग्गज भारतीय फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
ज्योतीदा सर्वत्र दिग्गज राजकारणी म्हणूनच ओळखले जात असले तरी त्यांचे खेळावरही भरपूर प्रेम होते. त्यामुळेच ते शहरातील खेळाच्या विकासासाठी वेळोवेळी मदतीचा हातही पुढे करीत होते, असेही या दोघांनी म्हटले आहे.
बंगाल टायगर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पत्नी डोनासोबत जाऊन ज्योती बसू यांचे अंत्यदर्शन घेतले व आपली श्रद्धांजली अर्पण केली.

No comments: