Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 January, 2010

आयटी हॅबिटेटसाठी युवक कॉंग्रेस आग्रही

बाबूशना शह देणार!
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या गोवा भेटीचे औचित्य साधून गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसने आपल्याच सरकारातील शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना लक्ष्य बनवण्याचे ठरवले आहे. ताळगाव येथे बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा वचपा काढताना दोनापावला येथील बंद पडलेल्या राजीव गांधी आयटी हॅबीटेट प्रकल्पाच्या कामाला चालना मिळवून देण्यासाठी श्री.गांधी यांना गळ घातली जाणार आहे.
आज कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या भेटीचा कार्यक्रम प्रदेश युवाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांसमोर सादर केला. राहुल गांधी हे १९ रोजी गोव्यात दाखल होतील.आपल्या ४८ तासांच्या या भेटीत ते गोवा विद्यापीठात विद्यापीठ तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी सुमारे एक तास संवाद साधतील. गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती व युवा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. युवा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे विषय त्यांच्याकडे उपस्थित करण्यात येणार आहेत. युवा कॉंग्रेसवर झालेला हल्ला व दोनापावला आयटी हॅबीटेटच्या विषयाला प्राधान्य देण्याचेही ठरवण्यात आल्याचे श्री.आमोणकर म्हणाले. राहुल गांधी हे थेट मध्यप्रदेशातून गोव्यात येणार आहेत.
दोनापावला येथील राजीव गांधी आयटी हॅबीटेट हा राज्य सरकारचा राज्यातील सुशिक्षित युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प आहे व तो केवळ बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधामुळे बंद आहे, हे राहुल गांधी यांना पटवून देण्यात येईल. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी युवा कॉंग्रेसतर्फे शांततेत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला व त्यात अनेक युवा नेते गंभीर जखमी झाले होते,असेही यावेळी श्री.आमोणकर म्हणाले.याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली असली तरी त्याची चौकशी थंडावली आहे.मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्षांकडे अनेकवेळा विनवण्या करूनही ही चौकशी पुढे सरकत नाही, यामुळे आता राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून या एकूण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश सरकारला द्यावेत,अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गरज सरो आणि वैद्य मरो!
"गरज सरो आणि वैद्य मरो' ही कॉंग्रेसची फार जुनी सवय राहिलेली आहे, अशी टीका अनेकजण करतात. बाबूश मोन्सेरात यांच्याबाबतीत सध्या याचीच प्रचिती येत आहे. राज्यात लोकांच्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरलेले व सर्वत्र विकासकामांचा धडाका लावून लोकप्रिय ठरलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालचे भाजपचे सरकार खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसने ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मदत घेतली. बाबूश यांनीच पुढाकार घेऊन तत्कालीन भाजप सरकारातील काही आमदारांना आपल्या बाजूने खेचले व हे सरकार तत्कालीन राज्यपाल एस.सी.जमीर यांच्या मदतीने पाडले गेले. या घटनेला पुढील महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षांत बाबूश मोन्सेरात यांना वरचेवर चुचकारून कॉंग्रेसने आपली सत्ता टिकवली खरी पण या पाच वर्षांत त्यांना मिळालेली वागणूक मात्र अजूनही त्यांना सलत आहे. बाबूश समर्थकांनी पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी सरकारातील आमदार असूनही बाबूश, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात, मुलगा व पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण बरेच गाजले व नंतर बाबूश यांच्या मागणीनुसारच त्याची चौकशी "सीबीआय' कडे सोपवण्यात आली. आता दिगंबर कामत यांच्याविरोधात सरकाराअंतर्गत सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बाबूश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची घटना घडली. आता युवा कॉंग्रेस हल्ला प्रकरण उरकून काढून त्यांना लक्ष्य बनवण्यात येत असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसच्या या सुडाच्या राजकारणाला बाबूश कशा पद्धतीने तोंड देतात हेच आता पाहावे लागणार आहे.

No comments: