Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 January, 2010

बोरकरांच्या कविता काळजाला भिडणाऱ्या

मराठी साहित्य संमलेनातील परिसंवादातील सूर
पणजी, दि. १६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): अध्यात्मात जीवनातील सर्व घटक सामावले आहेत. कविवर्य बा. भ. बोरकर हे अध्यात्मनिष्ठ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यिक जीवनात संतवांङ्मयाची वाट पकडली होती. म्हणूनच त्यांच्या कविता काळजाला भिडतात. कविता ही कवितच असते ती जुनी किंवा नवी नसते. कवितेचे स्वरूप कोणतेही असले तरी ती
ती काळजाला भिडणारी असावी, असा सूर कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित
पहील्या अखिल भारतीय मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात झालेल्या "आनंदयात्री बाभ बोरकर' या परिसंवादात व्यक्त झाला.
अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत पाठक होते. प्रा.अनिल सामंत, डॉ. सुरेश जोशी, व डॉ.सोमनाथ कोमरपंत व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.कोमरपंत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले.
बोरकरांची विरक्त कविता या विषयावर बोलताना डॉ. जोशी म्हणाले, बोरकरांच्या कविता प्रीतरसात ओथंबलेल्या आढळतात. संतशैलीत न्हालेल्या बोरकरांच्या विरक्त कविता
म्हणजे विरक्तीची आनंदगीते आहेत. त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान होता; पण त्यांनी इतर संस्कृतींचा द्वेष केला नाही. त्याचे मुख्य वैशिष्ट्य हेच होते. त्यामुळे ते सर्वार्थाने
ज्ञानेश्र्वर, टागोर, बालकवी यांच्या पंगतीत शोभतात.
प्रा. सामंत म्हणाले, संत जसे दुःखातही आनंदा साजरा करीत जगले त्याचप्रमाणे जीवनाकडे समग्रपणे बघण्याची दृष्टी बोरकरांकडे होती. त्यांच्या साहित्यातील विचार भावनेचे पंख घेऊन येतात. बोरकरांनी कोकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत साहित्यनिर्मिती केली.
आज भाषेवरून तंटे निर्माण होतात. माणसामाणसांत द्वेषाच्या भिंती तयार होत आहेत. म्हणूनच बोरकरांसारख्या साहित्यिकांची जन्मशताब्दी साजरी करणे गरजेच आहे. निदान त्यामुळे भाषावादाला तिलांजली मिळण्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती होऊ शकेल.
डॉ.यशवंत पाठक म्हणाले, बोरकरांसारखे कवी आत्मशोधाच्या जाणिवेला सन्मुख होऊन जगले. त्यांचे स्मरण अशा संमेलनातून होणे गरजेचे आहे.
आयोजकांच्या वतीने याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

No comments: