Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 January, 2010

ऑस्ट्रेलियात भारतीयांना आता बारमध्येही 'बंदी'

मेलबर्न, दि. १६ : अलीकडेच भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच भारतीयांना आता ऑस्ट्रेलियात मद्यालयातही प्रवेशबंदी करण्यात आली असून याचे कारण "वंशवाद' हेच असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सुजन पाठक याने सांगितले की, अभिषेक अग्रवाल हा आमचा सहकारी लवकरच भारतात परतणार आहे. त्याला मेजवानी द्यावी या हेतून आम्ही सहाजण मित्रमंडळी येथील लायन हॉटेल बारमध्ये गेल्या बुधवारी गेलो. मात्र तेथे आम्हाला चक्क प्रवेश नाकारण्यात आला. आमच्यासोबत आमचे तिघे नेपाळी मित्रदेखील होते. आम्ही त्याबाबतचे कारण विचारले तेव्हा आम्हाला कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यातील आणखी संतापजनक गोष्ट म्हणजे आम्ही मित्रांनी ताबडतोब जवळच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे आमची कैफियत मांडली. मात्र त्यांनीही काखा वर केल्या आणि कोणतीही मदत करण्यास असमर्थता दर्शवली. एवढेच नव्हे तर मेलबर्नमधील जवळपास सर्वच बारमध्ये कोणत्याही ग्राहकास कसलेच स्पष्टीकरण देण्याला आम्ही बांधिल नाही, अशा नोटिसा लावण्यात आल्या आहेत.
आम्ही अजिबात मद्यपान केले नव्हते. रांगमध्ये शिस्तीत उभे होतो. मात्र आमचा क्रमांक येताच ताबडतोब तेथील मंडळींनी आम्हाला बाहेरचा दरवाजा दाखवला. आमच्याकडे वयाचे दाखले व परदेशात लागणारी सगळी कागदपत्रे व्यवस्थित होती. तरीही आम्हाला अक्षरशः तेथून हुसकावून लावण्यात आले. अखेर आम्ही दहा मिनिटे वाट पाहिली आणि तेथून घरची वाट धरली. तुम्ही मंडळी बारमध्ये जाऊ शकत नाही, एवढेच आम्हाला सांगण्यात आले, अशी माहिती पाठक याने दिली. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांना हेतूपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वंशवाद हेच त्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने ती शक्यता फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर या युवकांना बारमध्ये प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून नव्याने वादाचे मोहोळ उठण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दादागिरीचा भारतात तीव्र निषेध केला जात असल्याने भारत सरकारनेदेखील या घटना गंभीरपणे घेतल्या असून त्याबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारला कडक भाषेत अवगत केले आहे. दुर्दैवाने तेथील सरकार अजूनही या घटना गंभीरपणे घ्यायला तयार नाही हेच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांचे दुःख आहे.

No comments: