Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 October, 2009

काणकोण मूत्रपिंड संकटावर आयुर्वेद उपचार शक्य


डॉ. वैद्यचुडामणी रघुवीर भिडे यांचा विश्वास


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)-काणकोण भागातील जादातर लोकांना मूत्रपिंडाचा त्रास होतो हे आता राज्य सरकारच्या सर्वेक्षणातही सिद्ध झाले आहे व त्यामुळे त्याबाबत गंभीरपणे विचार व्हायला हवा. या संकटावर आयुर्वेदाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मात करता येणे शक्य आहे, असा विश्वास डॉ.वैद्यचुडामणी रघुवीर पां.भिडे यांनी व्यक्त केला. सरकार किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेची त्यासाठी तयारी असल्यास आपण याबाबत पुढाकार घेण्यास राजी आहोत,असेही ते म्हणाले.
गोवा विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद परिषदेसाठी उपस्थित राहिलेले डॉ.वैद्यचुडामणी रघुविर भिडे यांनी अलीकडेच काणकोण भागाला भेट दिली. या परिषदेवेळी झालेल्या चर्चेत सरकारी आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.राजेंद्र तांबा यांनी काणकोणातील मूत्रपिंडाच्या विषयावर सविस्तर माहिती दिली. या परिषदेत आयुर्वेद व एलोपथी अशा दोन्ही क्षेत्रातील डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधल्याने याविषयावर सविस्तर चर्चा झाली.डॉ.भिडे यांनी डॉ.तांबा व डॉ.दिवाकर वेळीप यांच्या सोबत या भागात भेट दिली व अनेक रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत मूत्रपिंड रुग्णांची भयानकस्थिती त्यांच्या लक्षात आली. हा विषय या लोकांसाठी केवळ आरोग्याशी संबंधित राहिला नाही तर तो एक सामाजिक विषय बनला आहे. सरकारने अलीकडेच या रुग्णांचा "डायलेसीस'चा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे ही स्तुत्य गोष्ट आहे पण त्यासाठी या रुग्णांना इस्पितळात जावे लागते. औषधांचा खर्च येतो. साधारणतः एका रुग्णाला दिवसाकाठी १४० रुपयांचा खर्च येतो,असेही पाहणीत आल्याचे ते म्हणाले. मूत्रपिंडाचा त्रास वाढल्यानंतर रुग्णाला डायलेसीसचा आधार घ्यावा लागतो हे खरे पण नव्या लोकांना या आजाराची लागण होणार नाही, यासाठी सरकारकडे काहीही उपाययोजना नाही.
आयुर्वेद हे अलीकडच्या काळात सर्वमान्य व एक परिपूर्ण आरोग्यशास्त्र आहे हे सर्वांनी मान्य केले आहे.या शास्त्राच्या आधारावर या संकटावर मात करणे शक्य आहे. या आजाराचा नव्यानेच त्रास सुरू झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यास ते या संकटापासून वाचू शकतात.या औषधांचा खर्चही कमी असेल.साधारणतः दिवसाला ३० ते ४० रुपये या प्रमाणे औषधांचा खर्च असून किमान चार ते पाच महिन्यांचा हा औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास त्याचा लाभ अनेकांना मिळेल,असा विश्वास यावेळी डॉ.भिडे यांनी दिला. सरकार "डायलेसीस'वर खर्च करतेच पण त्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करून या लोकांवर आयुर्वेद उपचाराची संधी त्यांना देत असेल तर त्यासाठी पुढाकार घेता येईल,असेही ते म्हणाले.
सगळीकडे उपचार घेऊन झाल्यानंतरच लोक अखेर आयुर्वेद वैद्याकडे येतात हे खरे तर या शास्त्राचे दुर्भाग्य. "ऍलोपथी' केवळ रोगावर तात्पुरती मात करतो पण आयुर्वेदाव्दारे दोषांचे निराकरण होतेच व शरीरस्वास्थ पूर्ववत होण्यासही मदत होते.काणकोणवासियांना आयुर्वेदाचे वरदान मिळू शकेल याची आपल्याला पूर्ण खात्री आहे पण त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे शेवटी ते म्हणाले.

No comments: