Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 October, 2009

पाक लष्करी मुख्यालयावर दहशतवाद्यांचा हल्लाबोल

चौघे तालिबानी ठार
तालिबानने घेतली जबाबदारी
पाकिस्तानात प्रचंड खळबळ
हल्लेखोर लष्करी गणवेशात

इस्लामाबाद, दि. १० - पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर आज केलेल्या हल्ल्यानंतर मोठी चकमक उडून त्यात चार तालिबानी आणि पाक लष्कराचे काही जवान मारले गेले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आज दुपारी १२ च्या सुमारास लष्करी गणवेषातील काही तालिबान्यांनी या लष्करी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पहिला दरवाजा त्यांनी पारही केला होता. पण, दुसऱ्या दरवाजापाशी ते आले असता तेथील रक्षकांनी संशयावरुन त्यांना रोखले. त्यावेळी तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार अतिरेक्यांना ठार मारले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे काही जवानही मारले गेले. त्यांची संख्या मात्र लगेच कळू शकली नाही. तालिबान्यांनी हल्ला केल्याचे वृत्त कळताच संपूर्ण परिसरात लष्करी हेलिकॉप्टर्समधून कमांडोज उतरविण्यात आले आणि त्यांनी अतिरेक्यांवर मारा केला. अतिरेकी एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून आले होते.
ज्या चार अतिरेक्यांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ते चारही जण ठार मारण्यात आले आहेत आणि स्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे लष्कराचे मुख्य प्रवक्ते मेजर जनरल अब्बास यांनी पत्रकारांना सांगितले.
तालिबान्यांनी कालच पेशावर येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आज त्यांनी लष्करी मुख्यालयाला आपले लक्ष्य केले. तालिबान्यांचा प्रमुख गड असलेल्या वजिरिस्तानमध्ये येत्या काही दिवसांत लष्कर मोठी कारवाई करेल, असे विधान अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केल्याच्या काही क्षणानंतर हा हल्ला करण्यात आला, हे विशेष.
या हल्ल्यात आमचे काही जवानही मारले गेले आहेत, असे प्रवक्ते अब्बास यांनी सांगितले. पण, ही संख्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. किती जवान मारले गेले याचा आम्ही तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरेकी एका व्हॅनमधून आले, पहिल्या द्वारातून प्रवेश करण्यात ते यशस्वी झाले, पण दुसऱ्या दरवाज्याजवळ येताच त्यांना रोखण्यात आले असता त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, असे अब्बास यांनी सांगितले.
रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर हल्ला करण्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात आमचे चार सहकारी मारले गेले आहेत, पण त्यांनी आठ सैनिकांनाही ठार मारल्याचे संघटनेने म्हटले आहे. वायव्य सरहद्द प्रांतातील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
जिओ टीव्हीला टेलिफोनवरून संघटनेने ही जबाबदारी स्वीकारीत असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला अमजद फारूखी गटाने केल्याचेही सांगण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरूद्ध खटला चालविण्याची मागणीही या गटाने केली आहे.
एका आठवड्यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता आझम तारिक याने धमकी देताना म्हटले होते की, वजिरिस्तानमध्ये लष्करी कारवाई केल्यास त्याचे अतिशर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल आणि पाकिस्तानी लष्कराला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आमच्या सैन्याने अत्तर आणि दक्षिण वजिरिस्तानकडे कूच केले असून येत्या काही दिवसांत या भागात हल्ला करण्यात येईल.आमच्यापुढे कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटले आहे.

No comments: