आगोंद, दि. १६ (वार्ताहर) : दोन ऑक्टोबर रोजी काणकोणला झालेल्या जलप्रलयामुळे काणकोणवासीयांना बसलेल्या फटक्याने झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षण समितीने आज सकाळी काणकोणला भेट दिली.
या केंद्रीय पथकात राजीव सिन्हा, डॉ.अनुपमा बारीक, डॉ. रंगा रेड्डी, दिनेशचंद, वाय.सी.श्रीवास्तव या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, मामलेदार विनायक वळवईकर व अन्य अधिकारी होते. त्यांनी पाहणी पथकाला हानीची माहिती दिली. देळे, मैयक, अर्धफोंड, भाटपाल, सादोळशे, पैंगीण, खोतीगाव येथे सकाळी भेट दिली, तर दुपारी अन्य भागात हे पथक गेले.
केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव आ.पी.नाथ हे या पथकाचे प्रमुख आहेत. त्यांनी काल उत्तर गोव्याच्या काही भागांचा दौरा केला होता. या पथकाच्या अहवालानंतर केंद्राकडून अधिक निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.
Saturday 17 October, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment