Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 October, 2009

...तर खाजगी बस वाहतूक बंद !


सुदीप ताम्हणकर यांचे आमरण उपोषण सुरू


पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांबाबत उद्या दुपारपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही तर संध्याकाळी पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येईल. तेवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर गोवा बंदची हाक देणे अपरिहार्य ठरेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिला.
राज्य वाहतूक खात्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार, खात्यातील अधिकाऱ्यांमार्फत खाजगी बसमालकांना मिळणारी हीन वागणूक, गैरकारभाराबाबत पुराव्यासहित दाखल केलेल्या तक्रारींकडे होणारी डोळेझाक, संघटनेच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आदी अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी जुन्ता हाऊस मधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर आजपासून आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. उत्तर गोव्यातील बहुसंख्य खाजगी बसमालकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून सरकारला जागे करण्याचा हा उपाय हाती घेतला आहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांची महती सांगणारी मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्या या नेत्यांना त्यांची कितपत चाड हे आता लवकरच कळेल,असा टोलाही यावेळी श्री.ताम्हणकर यांनी हाणला.
दरम्यान, संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांत खात्यासाठी पूर्णवेळ संचालकाची नेमणूक करणे, वाहतूक खात्यातील साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांच्यावर कारवाई करणे, "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रद्द करणे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठीचे दर कमी करणे, प्रवासी बसगाड्यांना रेडियम टेप्स बसविण्याची सक्ती मागे घेणे, उपसंचालक अशोक भोसले, श्री. कुंडईकर यांच्यावर कारवाई करणे आदींचा समावेश आहे. सरकारकडून या मागण्यांबाबत वेळोवेळी चालढकल केली जात असल्याने त्याचा निषेध म्हणूनच आपण उपोषणाला बसल्याचे श्री. ताम्हणकर म्हणाले.
वाहतूक खात्याला पूर्णवेळ संचालकांची गरज आहे. केपे, मडगाव (नोंदणी विभाग), फोंडा आणि मडगाव (अंमलबजावणी) साठी पूर्णवेळ साहाय्यक संचालकांची आवश्यकता आहे. यासंबंधी वारंवार वाहतूक खात्याला व मंत्र्यांना निवेदने सादर करुनही कुणी लक्ष देण्यास तयार नाही. सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत अनेकजण बोलतात पण इथे भ्रष्टाचार व गैरकारभाराचे पुरावे असूनही कारवाई होत नाही.न्यायालयात जाणे हे सामान्य लोकांना परवडणारे नाही. सरकारी पातळीवर या तक्रारींची दखल घेऊन कारवाई होण्याची गरज आहे.वाहतूक खात्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो याची प्रत्यक्ष माहिती हवी असेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळवलेली सर्व कागदपत्रे आहेत, असेही ते म्हणाले.यावेळी महेश नायक,ऍड.सुभाष सावंत आदींनी श्री.ताम्हणकर यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक करण्याचा डाव वाहतूक अधिकाऱ्यांनी सुरुवात केला आहे.संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांच्या गाड्या पणजी ते कळंगुट मार्गावर धावतात.तिथे कुणालाही विश्वासत न घेता एका नव्या बस मालकाला तात्पुरता परवाना दिला आहे.तसेच इतर काही मार्गावरही असाच प्रकार घडला आहे. एकीकडे तात्पुरता परवाना देण्यास नकार देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्या मर्जीतील लोकांना लगेच हा परवाना दिला जातो हे कसे काय, उद्यापर्यंत हा परवाना रद्द करण्यात आला नाही तर या मार्गावरील बसगाड्या बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments: