Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 1 October, 2009

मोती डोंगरावरील तलवार प्रकरण जैसे थे!

आरोपपत्राच्या मंजुरीसाठीची विनंती वर्षभर सरकारकडे पडून

मडगाव, दि.३० (प्रतिनिधी) - गोव्याची व्यापारी राजधानी व मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या मडगावच्या कुप्रसिध्द मोतीडोंगरावरील बेकायदा तलवारींचे प्रकरण पंधरा महिने उलटून गेले तरी न्यायालयात दाखल न झाल्याने राजकीय दबावापोटी ते दडपून तर टाकले जाणार नाही ना,अशी चर्चा सध्या मडगावात सुरू झाली आहे. याप्रकरणी अजूनही संबंधितांविरुध्द आरोपपत्र दाखल झालेले नाहीच किंबहुना तपासकार्य कुठवर पोचले आहे ते सांगण्यासही अधिकाऱ्यांकडून सध्या चालढकल केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी घेतलेली पक्षपाती भूमिका वादग्रस्त ठरली होतीच परंतु आता आरोपपत्राचा विषयही बाजूला टाकला गेल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
२८ जून २००८ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. मठग्राम म्हणून ओळखले जाणारे हे शहर कोणत्या अवस्थेप्रत पोचले आहे, हे त्यामुळे दिसून आले होते. त्या दिवशी सापडलेल्या त्या नंग्या तलवारी कोणी व कशा आणल्या, कुठे दडवून ठेवल्या याचा पत्ता अखेरपर्यंत लागलाच नाही. त्यातून आके येथील एका फर्निचरवाल्याला स्वतःस समाजकार्यकर्ते म्हणविणाऱ्यांनी नंतर तेथून हाकलून लावले होते. तत्पूर्वी त्याच्या दुकानाला कोणीतरी आगही लावली होती. ही मंडळी नंतर एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निष्ठावान असल्याचे उघड झाले होते.
तलवारी प्रकरणात हात असलेल्या खऱ्या आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली खरी पण ते एका राजकीय असामीचे कार्यकर्ते असल्याचे उघड झाल्याने पोलिस तपास रोडावला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला गुदरण्यासाठी सरकारी मंजुरी मिळत नसल्याचा आरोपही होत होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर बेकायदा शस्त्रप्रकरणी कलम १५३-ए खाली गुन्हा नोंदविलेला आहे. त्यातही या कलमाला "ए 'हे अक्षर जोडले की तो गुन्हा जातीयवादाशी संबंधित होतो व त्या गुन्ह्याखाली जर आरोपपत्र दाखल करावयाचे असेल तर सरकारकडून मान्यता घेणे बंधनकारक ठरते. मडगाव पोलिसांनी मान्यतेसाठी पाठविलेला हा प्रस्ताव गेले पंधरा महिने कायदा खात्याकडे पडून आहे, त्यामुळे पोलिस खात्याबरोबरच कायदा खात्याच्या विश्र्वासार्हतेबाबतही प्रश्र्न उपस्थित झाला आहे.
मडगावांतील या प्रकरणाचे पडसाद साऱ्या गोव्यात त्यावेळी उमटले होते व तो संवेदनशिल प्रश्र्न बनलेला असताना सरकार त्या बाबत इतके असंवेदनशिल बनण्याचे नेमके कारण कोणते,असा सवालही केला जात आहे. गेल्या महिन्यात मडगावात पोलिस दलातील कमांडो पथकाच्या प्रात्यक्षिकांवेळी पत्रकारांनी मोतीडोंगरावरील तलवारी प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना वरिष्ठ पोलिस अधिकारी व मुख्यसचिवांसमक्ष सवाल केला होता व मुख्यमंत्र्यांसह सर्वच चमकले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी त्याबाबत मुख्यसचिवांकडे विचारणा केली होती व बाजूला बसलेले मुख्यसचिव व वरिष्ठ पोलिस अधिकारी एकमेकांची तोंडे पाहू लागले होते. शेवटी मुख्यसचिवांनी इतरांशी विचारणा करून त्वरीत त्याबाबत गृहखात्याकडे खुलासा मागवू असे आश्र्वासन दिले होते. पण या गोष्टीलाही महिना उलटून गेला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही सध्या या संदर्भात काहीच बोलायला तयार नसल्याने सामान्यांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.

No comments: