Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 August, 2009

राज्यामध्ये गेल्या दोन वर्षांत दूध उत्पादनात २० टक्के घट

विरोधी सदस्य सहकार मंत्र्यांवर कडाडले
शेतकऱ्यांना दूधदर वाढवून देण्याची मागणी


पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - राज्यात गेली दोन वर्षे दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली असून सरकारची उदासिनताच त्याला कारणीभूत असल्याची टीका आज विरोधी सदस्यांनी केली. काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे काणकोण तालुक्यातील दूध उत्पादनासंदर्भातील प्रश्न विचारून मिळालेल्या लेखी उत्तराच्या आधारे संपूर्ण राज्यात दूध उत्पादन घटले असल्याचे सहकार मंत्री रवी नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, रमेश तवडकर, मनोहर पर्रीकर आदींनी पै खोत यांच्या सुरात सूर मिसळताना, शेतकऱ्यांना चांगल्या जातीची जनावरे, गर्भरोपणासाठी चांगले बीज, दुभत्या जनावरांसाठी सकस खाद्य व शेतकऱ्यांना दुधाची चांगली किंमत मिळाल्यास या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील, असे सांगितले.
२००७ - ०७ साली तीन लाख लिटर, २००७ - ०८ साली २ लाख ८८ हजार लिटर व २००८ - ०९ साली २ लाख ४२ हजार दूध उत्पादन हे आकडे काय दर्शवतात, असा सवाल करून दूधाचे उत्पादन कमी होण्याची कारणे काय असावीत, असा सवाल श्री. खोत यांनी मंत्री नाईक यांना केला. त्यावर खाद्य वगैरे गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत नसतील तर त्यामुळे दूध उत्पादनात घट होणे शक्य असल्याचे रवी म्हणाले. महाराष्ट्रात दुधाचे दर वाढणार असल्याने गोव्यात त्याचे परिणाम होऊ शकतील. सरकारने त्यासंदर्भात काही विचार केला आहे का, या खोत यांच्या प्रश्नावर अद्याप तरी तसे झालेले नाही. गोवा डेअरीने त्यासाठी सरकारची अद्याप तरी परवानगी घेतलेली नाही, असेही रवी यांनी पुढे स्पष्ट केले. तथापि, दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी "कामधेनू'सारख्या योजनेचा त्यांच्याकडून उल्लेख केला जातो. केवळ योजना चांगल्या असून चालत नाही. चांगल्या जातीची जनावरे, गर्भधारणेसाठी चांगले बीज उपलब्ध करण्यासाठी सरकारी पातळीवर आवश्यक प्रयत्न होण्याची गरज आहे. सिधी, गीर, साईवाला यासारख्या स्थानिक वातावरणात टिकाव धरू शकणाऱ्या देशी गायी शेतकऱ्यांना मिळतील याची दक्षता घ्या. वासरू जन्माला आल्यापासून पुढे गर्भधारणेपर्यंत सत्तावीस महिने त्याची काळजी घेण्याची योजनाही त्यासाठी सरकारला आखावी लागेल, असे श्री. खोत यांनी रवी यांना सुचवले.
राज्यात दूधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवून देण्याची जोरदार मागणीही श्री. खोत यांनी यावेळी केली. दूध सोसायट्यांना डेअरीकडून प्रतिलिटर १३ रुपये ८४ पैसे दिले जातात. मात्र डेअरींकडून शेतकऱ्यांना अवघे नऊ किंवा साडे नऊ रुपये दिले जातात. कष्ट शेतकरी करतात आणि मलई मात्र सोसायटीवाले ओरपतात, अशी संतप्त टीकाही खोत यांनी यावेळी केली. रमेश तवडकर यांनीही खोत यांच्या या मागणीला पाठिंबा देताना शेतकऱ्यांना वाढीव दर मिळणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले. तसेच पार्सेकर यांनी सरकारी धोरणावर टीका करताना शेजारील राज्यांमध्ये दुधाचे उत्पादन वाढत आहे आणि गोव्यात मात्र गेल्या दोन वर्षांत ते २० टक्क्यांनी घटले असल्याचे सांगितले. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला. हा विषय सहजतेने घेता येणार नाही. राज्यात दूध उत्पादन का घटते आहे, याची कारणे शोधून काढा, गरज भासल्यास आपलीही मदत घ्या, असेही पार्सेकर यांनी यावेळी सुचवले. दरम्यान, कामधेनू योजनेअंतर्गत यापूर्वी दहा गुरे दिली जायची, आता ती २० दिली जाणार असून या योजनेतील प्रक्रियाही सुलभ करण्यात आल्याचे मंत्री रवी यांनी चर्चेदरम्यान सांगितले. तथापि, केवळ योजना जाहीर केल्याने दूध उत्पादन वाढणार नाही. ही योजना विचारपूर्वक राबवली तरच त्याचा फायदा होऊ शकेल, असे अनेक विरोधी सदस्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

No comments: