Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 July, 2009

२००३ च्या मुंबई स्फोटप्रकरणी तिघे दोषी, ३ ऑगस्टला शिक्षा

सहा वर्षांनी लागला निकाल

मुंबई, दि. २७- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी अखेर सहा वषार्र्ंंनंतर तिघांना दोषी ठरविण्यात आले. या तिघांना पुढील सोमवारी ३ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
अशरत अन्सारी (३२), सय्यद अनीस (४६) आणि त्याची पत्नी फहमिदा सय्यद (४३) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर "पोटा'अंतर्गत विशेष पोटा कोर्टात खटला चालविण्यात आला. लष्कर-ए-तोयबाचा या दुहेरी बॉम्बस्फोटात हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी ३ ऑगस्ट रोजी या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. यात त्यांना कमीत कमी जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अशा अतिरेकी कारवाईत एखाद्या दाम्पत्याला दोषी ठरविण्याची ही देशातील पहिलीच वेळ असावी.
संपूर्ण मुंबईला हादरविणाऱ्या या दुहेरी स्फोटात सुमारे ५२ जण ठार, तर शंभराहून अधिक जण जखमी झाले होते. मोहम्मद अन्सारी लड्डूवाला आणि मोहम्मद हसन बॅटरीवाला या दोघा आरोपींना "पोटा' आढावा समितीने गेल्या वर्षीच निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे त्यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात १०३ साक्षीदार तपासले असून त्यापैकी गेट वेजवळ बॉम्ब ठेवलेल्या टॅक्सीचा चालक हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. कटाचा मुख्य सूत्रधार नासीर अहमद हा शिवाजी पार्क येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. मुख्य तपास अधिकारी सुरेश वलीशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा पोलिस निरीक्षक सावदे, सहायक पोलिस निरीक्षक योगेशे चव्हाण, सूर्यकांत तळेकर यांनी केला.

No comments: