Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 July, 2009

हिंदू जनजागृतीचा२९ ला
विधानसभेवर भव्य मोर्चा
मूर्तिभंजन प्रकरणी सरकारच्या निष्क्रीयतेचा निषेध

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) ः- हिंदू देवतांच्या मूर्तिभंजनाची मालिका रोखण्यात विद्यमान सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ येत्या २९ रोजी हिंदू जनजागृती समितीने राज्य विधानसभेवर भव्य मोर्चा नेण्याचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात नाही. तसेच त्यांच्याकडून बेजबाबदार वक्तव्येही सुरू आहेत. गृह खात्याने स्थापन केलेले विशेष चौकशी पथकही निष्क्रिय ठरले आहे. अशावेळी सरकारला याप्रकरणी कृती करण्यास भाग पाडण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने राज्यव्यापी चळवळ उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचाच शुभारंभ विधानसभेवर मोर्चा नेऊन केला जाईल, अशी घोषणा या समितीचे संघटक जयेश थळी यांनी केली.
आज येथे पत्रपरिषदेत श्री.थळी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपराज्यप्रमुख नामदेव नाईक, हिंदू महासभेचे शिवप्रसाद जोशी, कॅप्टन दत्ताराम सावंत, केपे मंदिर सुरक्षा समितीचे समन्वयक आनंद प्रभुदेसाई, सनातन संस्थेच्या मीना कामत आदी पदाधिकारी हजर होते.या आंदोलनासाठी प. पू. श्री. ब्रह्मेशानंद स्वामींचे आशीर्वाद घेण्यात आले असून त्यांनी या चळवळीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. सध्या गोव्यात असलेले श्री नरेंद्रचार्य स्वामींचेही आशीर्वाद याप्रकरणी घेतले जातील,असेही यावेळी सांगण्यात आले. २९ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता समस्त हिंदू बांधव,भगिनींनी कदंब बसस्थानकाजवळील श्री मारुती मंदिराजवळ एकत्र व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.सरकारकडून हिंदूंना गृहीत धरले जात आहे.गेल्या २००४ सालापासून राज्यात एकूण २८ घटना घडूनही कुणालाही पकडण्यात येत नाही, याचा अर्थ काय,असा खडा सवाल श्री.थळी यांनी केला.हिंदू बांधव हे शांतताप्रिय आहेत, पण याचा अर्थ ते कमकुवत आहेत असा समज कोणी करून घेतला असेल तर त्याला चोख उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे. राज्यातील सर्व हिंदू धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सरकारला जागे करण्याची गरज आहे व त्यासाठी हिंदूंची एकी दाखवा,असेही आवाहन यावेळी श्री.थळी यांनी केले.
मूर्तिभंजन प्रकरणांवर विविध माध्यमांच्या साहाय्याने हिंदू लोकांकडून आंदोलने व जागृती सुरू आहे. याप्रकरणी रस्ता बंद,२० ऑक्टोबर २००८ रोजी झालेले ऐतिहासिक "गोवा बंद' आंदोलन,१० जानेवारी २००९ रोजी कांपाल पणजी येथे झालेले विराट "देवस्थान संरक्षण महासंमेलन' याव्दारे या घृणास्पद प्रकरणांचा निषेध करण्यात आला आहे. महासंमेलनानंतर मुख्यमंत्र्यांना कुणी विचारल्यानंतर ते ठराव आपल्याकडे पोहचलेलेच नाहीत,असे बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले तसेच गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडूनही याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली."" आम्ही गुन्हेगारांना पकडणार, महानंद नाईक याला पकडले नाही का'' असे म्हणणारे गृहमंत्री पुढील पंधरा वर्षे हिंदूंनी आपल्या देवतांची होत असलेली विटंबना मुकाट्याने सहन करावी अशी अपेक्षा करतात काय, असाही खडा सवाल यावेळी करण्यात आला. मूर्तिभंजन प्रकरणी गृह खात्याने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांना या प्रकरणांची चौकशी करण्यास वेळच नसून त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मुळात सरकार या संपूर्ण प्रकरणांकडे अजिबात गांभीर्याने पाहत नाही. सरकारचा हा हिंदूव्देषाचा पवित्रा त्यांना महागात पडेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मूर्तिभंजन प्रकरणी पकडलेला संशयित कवेश गोसावी याची ब्रेन मॅपींग व पोलिग्राम चाचणी केली पण त्याचा अहवाल अजूनही मिळालेला नाही. केपे पाराडो येथे चालक परवाना मिळालेल्या रियाज शेख तसेच अल्लाबक्ष आदींचे पुढे काय झाले, तेदेखील पोलिसांनी उघड केले नाही.या एकूण प्रकारांवरून राज्यातील भोंगळ सुरक्षेची कल्पना येण्यास हरकत नाही,असेही यावेळी सांगण्यात आले.
पेडणे तपासनाक्यावर पकडलेला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा ट्रक अचानक गायब होणे,मडगाव तलवार प्रकरणी दोषींवर कारवाई न होणे,"एनसीईआरटी' च्या इयत्ता सातवीच्या इतिहास पुस्तकातील वादग्रस्त धडे वगळणार असल्याचे गोवा शालान्त मंडळाने पोकळ आश्वासन देणे,राष्ट्रीय दिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान न रोखणे व २९ ऑगस्ट २००८ रोजी ओरिसा प्रकरणांवरून बेकायदा विद्यालये बंद ठेवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणे, यावरून सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते,असेही श्री.थळी म्हणाले.

No comments: