Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 July, 2009

रवींनी राजीनामा द्यावा

मूर्तिभंजनप्रकरणी आक्रमक आंदोलकांची मागणी

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - राज्यात होत असलेल्या मूर्तिभंजन प्रकरणांचा तपास लावण्यास शासनाला पूर्णपणे अपयश आल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री रवी नाईक यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार आज शेकडो हिंंदूंनी केली.
विधानसभेवर मोर्चा घेऊन जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना मांडवी पुलानजीक अडवल्याने पोलिस व आंदोलनकर्त्यात बराच तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला पोलिस रस्त्यावर पडल्या तर, मोर्चातील महिलांनाही दुखापत झाली. मात्र पोलिसांच्या विरोधाला न जुमानता "हर हर महादेव'ची घोषणा देत काही पोलिसांची मानवी साखळी तोडून आंदोलक महिला पुढे गेल्या.यावेळी त्यांच्यावर काबू मिळवण्यासाठी पोलिसांना "आयआरबी'च्या महिला पोलिसांची मदत घ्यावी लागली. यावेळी झालेल्या झटापटीनंतर जमावातील घनश्याम गावडे याला पोलिस अटक करून घेऊन गेल्याने तणाव अधिक भडकला. त्याला त्वरित सोडून देण्याची मागणी घेऊन जमावाने जुन्या मांडवी पुलावरील वाहतूक पूर्णपणे रोखली.त्यामुळे काही काळ वाहतुकीची बरीच कोंडी झाली.
मोर्चावर ताबा मिळवण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, उपनिरीक्षक तुषार लोटलीकर तसेच उपविभागीय न्यायदंडाधिकारी शाबाजी शेट्ये व अतिरिक्त मामलेदार सुधीर केरकर उपस्थित होते. अखेर आंदोलकातील पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन सादर करण्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. या शिष्टमंडळाने रवी नाईक यांच्याकडून त्वरित गृहमंत्रिपद काढून घेण्याची मागणी करीत मूर्तिभंजन प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी रियाझ शेख व अल्ला बक्ष यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली.
दुपारी ४ वाजता पणजी बसस्थानकावरील मारुती मंदिराच्या समोर नारळ वाढवून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश पाटणेकर व मिलिंद नाईक यांनी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविला. मोर्चाच्या सुरुवातीला सरकारच्या विरोधात आणि हर हर महादेवच्या जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर विधानसभेवर मोर्चा जात असताना सुरुवातीलाच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरून मोर्चा अडवण्यात आला.यावेळी पोलिसांनी आंदोलकांना जुन्या मांडवी पुलावर जाण्यास सांगितले. आंदोलक त्याठिकाणी पोचताच त्यांच्यावर "वरुण' या पाण्याच्या बंबाने मारा करून जमाव पांगवण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती. परंतु, या बंबाने ऐनवेळी दगा दिल्याने जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
राज्यात होत असलेल्या मूर्तिभंजनांबद्दल गृहमंत्री अद्याप शांत असल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आज हिंदू जनजागृती समितीने केली. १४ वर्षांपासून राज्यात २८ हिंदू देवतांच्या मूर्तीची मोडतोड झाली आहे. गेल्या दोन वर्षात या प्रकाराला ऊत आला असून मूर्तिभंजकांना पकडण्यास पोलिस असमर्थ ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सनातन संस्थेच्या राजश्री गडेकर, हिंदू महासभेचे प्रसाद जोशी, दिव्य जागृती ट्रस्टचे निवृत्त कॅ. दत्ताराम सावंत व शिवसेनेचे नामदेव नाईक यांचा समावेश होता.

"वरुण' झाला फुस्स!
मोर्चावर काबू मिळवण्यासाठी जमावावर पाण्याचा मारा करून जमाव पांगवण्यासाठी त्याठिकाणी ठेवलेल्या "वरुण' या खास बंबाने ऐनवेळी दगा दिल्याने पोलिसांची बरीच धावपळ झाली. मोर्चा सुरू होण्यापूर्वी दुपारी २ वाजता या बंबाची पोलिसांनी चाचणी घेतली होती. त्यावेळी या बंबातून पाण्याचा मारा होत होता. मात्र ज्यावेळी आंदोलक पुलावर नियंत्रणाबाहेर गेले,त्यावेळी मात्र या बंबाने पोलिसांना दगा दिला.
बॉस्को जॉर्ज
या जमावावर लाठीमार करण्यात आला आहे का, असा प्रश्न उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना काही पत्रकारांनी विचारले असता, त्यांच्यावर लाठीहल्ला केला असता तर, सर्व श्रेय त्यांना गेले असते. मी याठिकाणी येणेही माझ्या प्रतिष्ठेला न शोभणारे आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys