Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 May, 2009

... तर मंत्र्यांना मंदिरात "प्रवेशबंदी'

विविध हिंदू संघटनांना निर्वाणीचा इशारा


पणजी व हरमल, दि. १३ (वार्ताहर) ः हिंदू देवतांची मूर्तिभंजन करून जातीय तेढ माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने राज्य पोलिसांना दिलेली ४८ तासांची मुदत गुरुवारी संपुष्टात येत असून पुढील निर्णयासाठी उद्या सायंकाळी सर्व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली जाणार आहे. समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जोपर्यंत मूर्तिभंजनाचा तपास लागत नाही तोपर्यंत कोणत्याच मंदिरात मंत्र्यांना भावी काळात प्रवेश करू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा हिंदू जोडो अभियान व अन्य संघटनांनी दिला आहे.
बैठकीत तालुकास्तरावर नेमलेल्या मंदिर सुरक्षा समिती, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच अन्य समविचारी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. काल हिंदू जोडो अभियान, मराठी राजभाषा प्रस्तापन समिती, अखिल गोवा मंदिर सुरक्षा समिती, दिव्य जागृती ट्रस्ट, हिंदू जनजागृती समितीने गृहमंत्री नाईक यांना २८ देवळांतील मूर्तिभंजनाचा तपास अजूनही न लागल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मूर्तिभंजनाला जबाबदार असलेल्या टोळीला गजाआड करण्यासाठी पोलिसांचे मनोबल वाढण्याचे सोडून हिंदूंकडेच संशयाने का पाहतात, असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.
लोकवस्तीपासून लांब असलेल्या मंदिरातील मूर्तींना ही टोळी लक्ष्य बनवत आहे. अशा मंदिरांभोवती पोलिसांनी गस्त वाढवून त्या त्या गावातील लोकांना विश्वासात घेतल्यास हे कृत्य करणाऱ्या टोळीला गजाआड करणे कठीण होणार नाही. तथापि, तसे न करता राजकीय व्यक्तींच्या आदेशानुसार पोलिस तपास करत असल्याची टीका श्री. वेलिंगकर यांनी केली.
दरम्यान, गोव्यात सध्या सुरू असलेल्या मंदिर तोडफोड प्रकरणी गोवा सरकार व गृहमंत्री यांनी काहीच हालचाल न केल्याने आत्तापर्यंत २८ देवळांतील मूर्तिभंजन प्रकरणांत अजून कोणालाही अटक झालेली नाही. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यानेच त्याचा फायदा उठवून हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात करणे सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्वरित खुर्चीवरून पायउतार व्हावे, अशी मागणी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मंदिर सुरक्षा समितीचे अध्यक्ष राजेंद्र वेलिंगकर, मराठी राजभाषा प्रसारक समितीचे रमेश नाईक, दिव्य जागृती संघाचे अध्यक्ष निवृत्त कॅप्टन दत्ताराम सावंत, हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष जयेश थळी, हिंदू जोडो अभियानचे अध्यक्ष विजय तिनईकर, भाई पंडित, उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी सरकाराचा निषेध करून गृहमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास हिंदू प्रेमी संघटना आंदोलन छेडतील असा इशारा दिला. गृहमंत्री व मुख्यमंत्री हिंदू असूनही मूर्ती तोडफोड प्रकरणे उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
-------------------------------------------------------------
कवेशचाच हात?
कुंकळ्ळी येथे १७ मूर्तींची मोडतोड होण्याच्या तीन दिवसांपूर्वी कवेश गोसावी व त्याचा अन्य एक मित्र बक्षी हे दोघे त्या परिसरातील एका मंदिरात देव दर्शनासाठी गेले होते. यावेळी कवेश हा मंदिरात बराच वेळ बसला होता तर बक्षी बाहेर निघून गेला होता. काही वेळाने बक्षी परतल्यावर दोघेही तेथून निघून गेले. यानंतर दोन दिवसांनी येथील मूर्तींची मोडतोड झाल्याची माहिती खास सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज दिवसभर गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक कवेश याला घेऊन अनेक ठिकाणी चौकशीसाठी फिरत होते.
-------------------------------------------------------------------
...तर त्यांना सल्ला दिला असता का?
मंदिर सुरक्षा समितीनेच पैसे एकत्र करून सर्व मंदिरात सुरक्षा रक्षक तैनात करावे आणि त्या त्या मंदिरांना सुरक्षा द्यावी, असा गृहमंत्री रवी नाईक यांनी दिलेला सल्ला निंदनीय आणि खेदजनक असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र वेलिंगकर यांनी व्यक्त केली. हाच प्रकार चर्च किंवा मशिदीत घडला असता तर त्यांनी असा सल्ला ख्रिस्ती वा मुस्लिमांना दिला असता का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला असून गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हान दिले आहे.

No comments: