Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 May, 2009

आज भवितव्य नेत्यांचे व देशाचेही!

सर्वाधिक जागा कोणाला? राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची
जोडतोडीच्या घडामोडींना जोर

नवी दिल्ली, दि. १५ : पंधराव्या लोकसभेसाठी गेल्या महिन्याभरापासून झालेल्या पाच टप्प्यातील मतदानाचे निकाल आज हाती येणार असून त्यासाठी देशभरात हजारो केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. या कामासाठी देशातील सुमारे ६० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सर्व मतमोजणी केंद्रांवर हे काम सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. देशभरात सुमारे ४२६० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून तेथे ६० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आता निकालांसाठी टीव्हीवरील असंख्य वृत्तवाहिन्यांसह इंटरनेट आणि मोबाईलवरही सेवा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने निकालाची ताजी माहिती देण्यासाठी "डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ईसीआयरिजल्टस् डॉट एनआयसी डॉट इन' ही विशेष वेबसाईट तयार ठेवली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल क्षणोक्षणी या वेबसाईटवर मिळू शकणार आहेत.
१५ व्या लोकसभेतील खासदारांच्या निवडीसाठी मतदानाची प्रक्रिया यावेळी पाच टप्प्यात घेण्यात आली. १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान विविध राज्यांमध्ये मतदान पार पडले. पाच टप्पे मिळून देशात सरासरी ७१.३७ टक्के मतदान झाले. त्यासाठी ४६ राष्ट्रीय तसेच क्षेत्रीय पक्ष आणि अपक्षांसह ८०७० उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले आहे. एकूण ५४३ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले.
निवडणूक आयोगाने यावेळी नवे सॉफ्टवेअर मदतीला घेतले आहे. याच्या सहाय्याने प्रत्येक मतमोजणी केंद्रातील ताजे निकाल आयोगाला कळू शकणार आहेत. हे निकाल आयोगाच्या वेबसाईटद्वारे जगभरात दिसू शकतील. शिवाय, प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी आयोगाने स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे. दिल्लीतील आयोगाच्या मुख्यालयासमोर मोठे फलक लावून त्यावर निकाल दिसू शकणार आहे.

No comments: