Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 May, 2009

रालोआ २२५, संपुआ १८०? हिंदुस्थान समाचारचे निष्कर्ष

नवी दिल्ली, दि. १३ : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यानंतर हिंदुस्थान समाचार वृत्त संस्थेने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार १५ व्या लोकसभेत भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष असेल. हिंदुस्थान समाचारने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपला १६० ते १७० आणि कॉंग्रेसला १२० ते १३० पर्यंत जागा मिळतील असा निष्कर्ष स्पष्ट झाला आहे.
याबरोबरच निवडणूकपूर्व युती केलेल्या भाजप आणि मित्रपक्षांना सर्वांत मोठी आघाडी म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या मित्रपक्षांना या अहवालानुसार ४५ ते ५५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २१० ते २२५ पर्यंत जागा मिळतील असा अंदाज आहे. या अहवालानुसार कॉंग्रेसचे मित्रपक्ष सपा, द्रमुक, राजद, लोजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना एकूण ५० ते ५२ जागा मिळतील, त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला १७० ते १८० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. कॉंग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये समाजवादी पार्टीला २६, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला ९, द्रविड मुन्नेत्र कळघ्घम ७, राष्ट्रीय जनता दलाला ५, लोकशाही जनता पार्टीला ३ तर तृणमूल कॉंग्रेसला अधिकाधिक १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वेक्षणानुसार आगामी सरकार स्थापनेमध्ये बसपा, अण्णाद्रमुक - पीएसके आणि तेलगू देसम पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. परिणामतः ५१ जागा आगामी सरकारच्या स्थापनेत निर्णायक महत्त्व सिद्ध करतील. याशिवाय अतिरिक्त डाव्या आघाडीला २००४ मध्ये ६० जागा मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्यात घट होण्याची शक्यता आहे. डाव्या आघाडीला केरळ, प. बंगाल, त्रिपुरा इ. राज्यांत अंदाजे ३५ ते ४० पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. प. बंगाल आणि केरळ या दोन्ही ठिकाणी मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी डाव्या आघाडीच्या जागांच्या संख्येत घट होईल.
हिंदुस्थान समाचार समितीद्वारा निवडणुकी दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अत्यंत आश्चर्यकारक तथ्ये आढळून आली आहेत. राज्यवार केलेल्या सर्वेक्षणानुसार अंदाजित आकडेवारी याप्रमाणे ः
उत्तर प्रदेशमध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेत रालोआसह भाजपच्या जागांत दुप्पट वाढ होईल. बसपाला उत्तर प्रदेशात २० ते २२, सपाला २४ ते २६ आणि कॉंग्रेसला केवळ ५ ते ७ जागा मिळण्याचे अनुमान आहे. बिहारमध्ये जनता दल (यु.) १८, भाजप ११, राजद ५, लोजपा ३ आणि कॉंग्रेसला ०३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या अहवालानुसार दक्षिणेतील राज्यांमध्ये आश्चर्यकारकरीत्या भाजपने प्रवेश केला आहे. कर्नाटकात भाजपला २०, कॉंग्रेसला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत भाजपला पहिल्यांदाच २, केरळमध्येही २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम आणि नागरकॉईल तसेच केरळमध्ये थिरूअनंतपुरम व कासरगोड या जागांवर भाजपने आपला दावा पक्का केला आहे. आंध्र प्रदेशात भाजप २, कॉंग्रेस २२, तेलगू देसम ९ तर तेलंगणा राष्ट्र समितीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता असून अण्णाद्रमुकला १४, पीएमके ६, द्रमुक ७, कॉंग्रेस ७ आणि भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीला १०, कॉंग्रेसला ८ आणि भाजपला २ जागा मिळणार असून अंदमान निकोबारची एकमेव जागा भाजपच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ओरिसामध्ये बिजू जनता दल यंदाही आघाडीवर राहण्यात यशस्वी ठरेल. बिजू जनता दलाला ११, कॉंग्रेसला ३ आणि भाजपला ६ जागा मिळण्याचे अनुमान आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेसला ११, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ९, शिवसेनेला १२ तर भाजपला १३ जागा मिळतील. मध्यप्रदेशात भाजपला २२ तर कॉंग्रेसला ६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये यंदा भाजपच्या लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपला यावेळी १८, कॉंग्रेसला ८ जागांवर विजय मिळेल. राजस्थानमध्ये भाजपला १२, कॉंग्रेसला १३ जागा मिळतील. झारखंडमध्ये अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून ८ जागांवर भाजप तर ३ जागांवर कॉंग्रेस विजयी होईल. छत्तीसगडमध्ये भाजपला १० आणि कॉंग्रेसला १ जागा मिळेल. आसाममध्ये भाजपला फायदा होईल. आसाम गण परिषदेशी असलेल्या युतीमुळे भाजपला ५ आणि आ. ग. परिषदेला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. कॉंग्रेसला आसाममध्ये ६ जागा मिळतील.
हरयाणात भाजपला २, कॉंग्रेसला ६ जागा मिळतील. दिल्लीत भाजप ३ आणि कॉंग्रेसला ४ जागा मिळतील. जम्मू - काश्मीर मध्ये कॉंग्रेसला २ आणि भाजपला १ जागा मिळण्याची आशा आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल ८, भाजप ३, कॉंग्रेस २ तर हिमाचल प्रदेशात भाजप ३, कॉंग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला ३, कॉंग्रेस १ व इतर पक्ष १ याशिवाय प. बंगालमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीला १४, कॉंग्रेसला ८, तृणमूल कॉंग्रेसला १० तर भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये २ पैकी प्रत्येकी एका जागेवर कॉंग्रेस आणि भाजप येईल.
हिंदुस्थान समाचार संवाद समितीच्या पत्रकारांनी आणि देशभरातील माहितीच्या माध्यमांतून ५ टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाचव्या टप्प्याच्या समाप्तीनंतर हिंदुस्थान समाचार संवाद समितीने हा निवडणूक विश्लेषण अहवाल १३ मे रोजी, बुधवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.

No comments: