Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 May, 2009

पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील हिंसाचारात दोन ठार

अंतिम टप्प्यात ६२ टक्के मतदान
नवी दिल्ली, दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. यासोबतच लांबलचक निवडणूक प्रक्रियाही संपुष्टात आली. निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. आता सर्वांचे लक्ष १६ मे रोजी होऊ घातलेल्या मतमोजणीकडे लागले असून, जम्मू-काश्मीर वगळता उर्वरित ठिकाणी सुमारे ६० ते ७० टक्के मतदान झाल्याची माहितीही आयोगाने दिली. मतदानादरम्यान तुरळक हिंसाचाराच्या घटना वगळता उर्वरित निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचारात दोन जण ठार झाले.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रियेने अपेक्षेनुसार वेग घेतला नव्हता. असह्य उकाडा आणि सूर्य आग ओकत असल्यामुळे मतदार घराबाहेर पडणार नाहीत अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु दुपारनंतर विविध राज्यांमध्ये मतदारांनी अगदी उत्साहात मतदान केले. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विविध राज्यांमधील मतदानाच्या टक्केवारीवर एक नजर टाकली असता तामिळनाडूत ६० ते ६२, उत्तर प्रदेशात ५२, पुड्डुचेरीत ७५, पंजाबात ६० ते ६५, पश्चिम बंगालमध्ये ७०, उत्तराखंडमध्ये ५० ते ५५, हिमाचल प्रदेशात ५५ आणि जम्मू-काश्मिरात ४० ते ४५ टक्के मतदान झाले.
मतदान सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरापासून काही अंतरावर असलेल्या बालीगुडी गावात तृणमूल कॉंग्रेस व माकपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात एक जण ठार झाला. तामिळनाडूतील तीन विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक ठार, तर १३ जण जखमी झाले. डिंडिगुल तहसिलात विरोधी अण्णाद्रमुक आणि सत्तारूढ द्रमुक समर्थकांमध्ये झालेल्या वादाची परिणती संघर्षात झाली. अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी भोसकल्यामुळे डीएमके कार्यकर्ते एस. थंगावेल यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. थंगावेल यांच्या हत्येनंतर डीएमके समर्थकांनी या भागात चांगलाच धुमाकूळ घातला व मोठ्या प्रमाणावर दगडफेकही केली. त्यामुळे डिंडिगुल तहसिलात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंजाबातही दोन पत्रकारांवर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पंजाबातील सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी मोगा क्षेत्रातील दुनेका गावात खाजगी टीव्ही वाहिन्यांच्या दोन पत्रकारांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. पत्रकारांनी वाहनांमध्ये शस्त्रे घेऊन जात असलेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ चित्रण केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, द्रमुकचे टी. आर. बालू, दयानिधी मारन, एम. के. अझागिरी, कॉंग्रेसचे मोहम्मद अझरूद्दीन, भाजपच्या मनेका गांधी आणि वरुण गांधी, मुख्तार अब्बास नकवी, एमडीएमकेचे वायको अन् सपाच्या जयाप्रदांचे भाग्य मशिनबंद झाले आहे.

No comments: