पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक नुकतीच झाली, निकाल झाला, विजयोत्सवही साजरा करण्यात आला. मात्र आज अचानकपणे निवडणूक प्रक्रियाच बेकायदा ठरवून लोकशाही पद्धतीने विजयी झालेले भाजपप्रणीत विद्यार्थी मंडळच विद्यापीठाने रद्दबातल ठरवले. त्याचबरोबर विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे संचालक डॉ. बाळकृष्ण कानोळकर यांना मंडळाच्या संचालक पदावरून हटवण्यात आल्याचा आदेश सायंकाळी उशिरा जारी झाला. विद्यापीठाची ही कृती म्हणजे सरकारच्या राजकीय हस्तक्षेपाचा कळस असल्याचा आरोप भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाने केला आहे. तसेच आंदोलनाद्वारे या निर्णयाला कडाडून विरोध केला जाईलच आणि वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा झणझणीत इशाराही भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाने दिला आहे.
"आपण विद्यापीठातील वरिष्ठांकडून मान्यता घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचललेले नाही' असे डॉ. कानोळकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.
मंडळाच्या संचालकांनी नियमानुसार निवडणूक घेतली नसल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे मंडळ रद्द ठरवून निवडणूक नव्याने घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र विद्यापीठाच्या या कृतीमुळे विद्यार्थी विभागात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. सदर मंडळाची निवडणूक नव्याने घेतली जाणार असून लगेच तारीख जाहीर केली जाणार असल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे.
२३ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी विभागातर्फे सादर झालेली उमेदवारीचे अर्ज वेळेनंतर सादर झाल्याने आणि त्यातील काही अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी भरले आहेत, हे स्पष्ट होत नसल्याने विद्यापीठाने ते २४ रोजी फेटाळून लावले होते. दि. २३ रोजी कॉंग्रेस विद्यार्थी विभागाचे अर्ज उशिरा दाखल झाल्याने विरोधी गटाने त्यास आक्षेप घेऊन तक्रार दाखल केली होती. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसप्रणित विद्यार्थी विभागाने विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहिले होते. या सर्व तक्रारींवर दि. २३ रोजी रात्री उशिरापर्यंत कुलसचिवांच्या दालनात चर्चा सुरू होती. त्यावेळी तेथे मंडळाचे माजी संचालक रामदास करमली, प्रा. एन. एस. भट व कुलसचिव तसेच डॉ. कानोळकर उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी दोन्ही विभागाच्या प्रमुखांना बोलावून अर्जांची छाननी करा आणि पुढचा निर्णय घ्या, असे आदेश कुलसचिव डॉ. सांगोडकर यांनी मंडळाचे अध्यक्ष डॉ. कानोळकर यांना दिले होते, अशी माहिती डॉ. कानोळकर यांनी दिली. त्यानुसारच त्यादिवशी अर्जाची चाचणी करून पुढील निवडणूक घेतलेली आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी झालेली निवडणूक विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी समीर मांद्रेकर हे व त्यासह त्यांचे सर्वच उमेदवार या निवडणूक विजयी झाले होते.
भाजयुमो विद्यार्थी विभाग
कॉंग्रेस राजवटीत भाजयुमो विद्यार्थी विभागाचा झालेला दणदणीत विजय कॉंग्रेस पक्ष पचवू शकले नसल्यानेच कॉंग्रेसने अशा प्रकारेच घाणेरडे राजकारण करण्यास सुरुवात केली असल्याचा जोरदार आरोप आज सायंकाळी विद्यार्थी विभागाचे सहनिमंत्रक सिद्धेश नाईक यांनी केला. तसेच या "आम आदमी'च्या सरकारने विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही श्री. नाईक यांनी दिली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत शिरलेल्या पक्षीय राजकारणाचा "अभाविप'ने निषेध केला आहे. लोकशाही पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका रद्द ठरवण्याचा घाट विद्यापीठाने घातल्याचा आरोप अभाविपचे सहमंत्री रोहन मयेकर यांनी केला.
"हे घाणेरडे राजकारण'
या निवडणुकीच्या कामकाजात सरकारकडून झालेला हस्तक्षेप हे घाणेरडे राजकारण असून विद्यापीठाने त्यास बळी पडणे हे तर त्याहून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
Saturday 27 September, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment