Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 September, 2008

भाजप विद्यार्थी पॅनेलचे विद्यापीठावर वर्चस्व


भाजप विद्यार्थी विभागाचे विजेते: किशोर कृष्णा नाईक, समीर दयानंद मांद्रेकर व कु. स्नेहा सुरेश गावस. (छाया: प्रीतेश देसाई)

हा युवाशक्तीचा विजय: पर्रीकर
लोकशाही मार्गाने या निवडणुकीत उतरलेल्या युवाशक्तीचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष, सचिव व विद्यार्थिनी प्रतिनिधी बिनविरोध
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : कॉंग्रेस विद्यार्थी विभागाचे ९ अर्ज छाननीवेळीच बाहेर पडल्याने आज भाजप विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष समीर दयानंद मांद्रेकर, सचिव किशोर कृष्णा नाईक व विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधीपदी कु. स्नेहा सुरेश गावस यांची बिनविरोध निवड झाली. या विजयाने भारतीय जनता पक्षप्रणीत विद्यार्थी विभागाने कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाचा धुव्वा उडवून विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत विद्यापीठावर आपला झेंडा रोवला.
या अर्जांच्या चाचणीवेळी कॉंग्रेस विद्यार्थी विभागाच्या पॅनलमधील केवळ श्रीपाद नारायण आंबेकर यांचा अर्ज ग्राह्य धरल्याने उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता गोवा विद्यापीठात मंडळ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.
वरील विद्यार्थ्यांसह साईनाथ कासकर, किरण फातर्पेकर, आश्विन लोटलीकर, कौतुक रायकर, विठ्ठलकांत फळदेसाई व धीरज देसाई यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
वेळ होऊन गेल्याने आणि नेमके कोणत्या पदासाठी अर्ज भरलेले आहेत, हे स्पष्ट होत नसल्याची कारणे देऊन कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाच्या पॅनेलमधील नऊ अर्ज आज विद्यापीठाने रद्द ठरवल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.
अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होती. त्यावेळी भाजप विद्यार्थी विभागाने अध्यक्ष, सचिव व विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी भरलेले डमी अर्ज मागे घेतले. तर कॉंग्रेस विद्यार्थी विभागाच्या पॅनेलमधील एक सोडल्यास सर्व अर्ज बाद ठरले. छाननी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी विद्यार्थी मंडळ संचालक डॉ. बी. जी. कानोळकर यांनी ग्राह्य धरण्यात आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीची यादी सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली.
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक घडामोडींना जोर आला होता. दोन्ही बाजूंच्या गटाने प्रतिनिधींची शिबिरे लागली होती. मात्र ३७ पैकी २१ प्रतिनिधी आपल्याकडे असल्याचा दावा भाजप विद्यार्थी विभागाने केला होता. त्यामुळे निवडणूक झाली असल्यासही आमचाच विजय निश्चित होता, असा दावा "भाजपयुमो'चे सरचिटणीस रुपेश महात्मे यांनी आज केला.

No comments: