Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 September, 2008

बाबूश हल्लाप्रकरणी चौकशीस 'सीबीआय'कडून मान्यता

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी) : ताळगावचे आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांकडून पणजी पोलिस स्थानकावर झालेला हल्लाबोल व त्याची परिणती म्हणून पोलिसांनी केलेली बाबूश यांच्या बंगल्याची मोडतोड, त्यांच्यासह पत्नी जेनिफर मोन्सेरात, मुलगा अमित मोन्सेरात, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांना झालेली जबर मारहाण आणि अटक या रणकंदनाच्या चौकशीला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग(सीबीआय)ने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज ही माहिती पत्रपरिषदेत दिली. गोव्याला छोट्या राज्यांच्या गटात मिळालेले पहिल्या क्रमाकांचे बक्षीस स्वीकारण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांना "सीबीआय'कडून ही माहिती देण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी "सीबीआय'मार्फत होणार असल्याने सत्य उजेडात येईल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गेल्या १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. मोन्सेरात यांच्या समर्थकाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कारवाई करीत नाहीत तसेच गुन्हेगारांना अटक करीत नाही म्हणून ताळगाव मतदारसंघातील बाबुश समर्थक लोकांनी भव्य मोर्चा पणजी पोलिस स्थानकावर नेला होता. तेव्हा दिलेल्या मुदतीत पोलिसांनी कारवाई केली नसल्याने अचानक पोलिस स्थानकावर दगडांचा वर्षाव करून तेथील काही वाहनांची तोडफोड व जाळपोळही करण्यात आली होती. या हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी तथा शिपाई जखमी झाल्याने त्यांना इस्पितळांत दाखल करावे लागले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी पोलिसांनी बाबूश यांच्यावरच प्रतिहल्ला केला होता. मिरामार येथील त्यांच्या अलिशान बंगल्याची पूर्ण मोडतोड करण्यात आली होती. त्यानंतर ताळगाव येथील त्यांच्या घरात घुसून त्यांचे पुत्र अमित मोन्सेरात यांना मारहाण करण्यात आली व त्याला पोलिस स्थानकांत आणण्यात आले. अमित मोन्सेरात यांची विचारपूस करण्यासाठी आलेले बाबूश, त्यांची पत्नी जेनिफर व पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस या तिघांनाही पोलिसांनी बेदम मारहाण करून त्यांना पोलिस कोठडीत डांबले होते. आमदार,जिल्हा पंचायत सदस्य व महापौर अशा तिघाही लोकप्रतिनिधींना बेदम मारहाण केली जाण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना. पोलिसांनी ही कारवाई तत्कालीन अधीक्षक नीरज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. त्यावेळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक व उपअधीक्षक मोहन नाईक यांना याप्रकरणी बदली करण्यात आली होती.
ही घटना घडली तेव्हा बाबूश मंत्री नव्हते. आता विद्यमान सरकारात ते मंत्री असल्याने "सीबीआय'चौकशीचे महत्त्व अधिक वाढणार आहे.बाबूश यांनी या प्रकरणी तत्कालीन वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर आरोप करून त्यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी ही कृती केल्याचा ठपका ठेवला होता. आता या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होते व त्यातून काय निष्पन्न होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

No comments: