Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 September, 2008

अभिषेकी संगीत संमेलनात रंगले कलेचे वारकरी!

पणजी, दि. २१ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - पणजीत कला अकादमीतील पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव या दोन दिवशीय स्वरयज्ञाची किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने आज सांगता झाली. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व कला अकादमी यांनी आयोजित केलेल्या या कला महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १६ दिग्गज गायक व वादकांनी सहभाग घेतला होता.
आजच्या पहिल्या सत्राची सुरुवात रेवती कामत, नीला भागवत,अजित कडकडे यांच्या गायनाने व रविंद्र च्यारी यांच्या सतार वादनाने झाली. कडकडे यांनी आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रात महेश काळे, पं. कमलाकर नाईक, डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन झाले तर शीतल कोलवाळकर व कावेरी आगाशे यांनी कथ्थक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.
२००१ सालापासून अमेरिकेत राहूनही अभिषेकी बुवांकडून घेतलेले संगीत शिक्षण स्वतःमध्ये जपून त्याचा देश विदेशात प्रसार करणारे महेश काळे यांनी आपल्या गायनाने अभिषेकीबुवांच्या भावविश्व गायनाचे दर्शन घडविले. यावेळी ते म्हणाले की, अभिषेकीबुवांनी शिकवलेले संगीत बुवांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गाणे आणि श्रोत्यांना ते आवडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. बुवांनी तयार केलेली गाणी कुणीही गायिली तरी ती सुंदरच वाटणार असे अभिमानपूर्वक त्यांनी नमूद केले. त्यांनी गायिलेल्या "अभीर गुलाल उधळीत रंग' अभंगाला श्रोत्यांनी डोक्यावर घेतले.
पं. जितेंद्र अभिषेकी हे एक गुणी कलाकार होते. अशा कलाकाराच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या संमेलनात आपली सेवा रुजू झालीच पाहिजे असे डॉ. प्रभा अत्रे विनम्रपणे म्हणाल्या. म्हणूनच या संमेलनात सहभागी होण्यास आपल्याला आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.
समारोपाच्या सत्रात पं. अभिषेकीबुवांचे सुपुत्र शौनक अभिषेकी म्हणाले की, या संमेलनात बाबांचे अस्तित्व जाणवते. बाबांनी गोव्यावर मनापासून प्रेम केले होते. आणि आपल्या मायभूमीवर प्रेम करायला आम्हालाही शिकविले. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या संमेलनाला उदंड प्रतिसाद लाभतो आणि तो असाच सदोदित मिळत रहावा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, संताप्रमाणेच कलाकारही अथक तपश्चर्या करीत असतो आणि म्हणूनच तो नावरुपाला येतो. गोव्याच्या या भूमीत होणाऱ्या या संमेलनात कलेचे वारकरी यावेत आणि आषाढी एकादशीप्रमाणे हे संमेलन गजबजून जावे.
कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या सत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ त्यांच्या प्रतिमेला अजित कडकडे व त्यांच्या अन्य शिष्यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन डॉ.अजय वैद्य यांनी ओघवत्या शैलीत केले तर कला अकादमीचे कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. गोविंद काळे यांनी ऋणनिर्देश केला.

No comments: