Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 September, 2008

विद्यार्थी प्रतिनिधी पळविण्यासाठी कॉंग्रेसकडून पोलिसांचा वापर

भाजयुमोचा गंभीर आरोप
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी विभागाचा विजय निश्चित असल्याने चलबिचल झालेल्या कॉंग्रेस पक्षाने भाजपच्या विद्यार्थी विभागाकडे असलेल्या विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींचे अपहरण करण्याची सुपारी म्हापशाचे पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील यांना दिल्याचा आरोप आज "भाजयुमो'चे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केला. ही सुपारी दक्षिण गोव्यातील कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ राजकीय व्यक्तीने दिल्याचे ते पुढे म्हणाले. एकूण ४० विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींपैकी, २१ प्रतिनिधी आपल्याकडे असल्याचा दावा भाजप विद्यार्थी विभागाने केला आहे.
दि. २४ सप्टेंबर रोजी विद्यापीठात विद्यार्थी मंडळाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत भाजपयुमोचा विद्यार्थी विभाग आणि कॉंग्रेस पक्षाशी सलग्न असलेली एनएसयुआय रिंगणात उतरलेली आहे. गोव्यातील विद्यार्थ्यासमोर असलेले प्रश्न आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी असते, याचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थी विभागाने म्हापसा येथील आत्माराम हॉटेलमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी काही प्रतिनिधींनी आजच याठिकाणी उपस्थिती लावली. याची माहिती मिळताच कॉंग्रेसच्या नेत्यांनी या प्रतिनिधींना उचलण्यासाठी राजकीय दबाव वापरून थेट म्हापसा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यामुळे सायंकाळी ५ च्या दरम्यान निरीक्षक पाटील आपल्या काही शिपायांना घेऊन या हॉटेलवर पोचले. दोघे तरुण बेपत्ता असल्याने आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी आलो आहोत, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ज्या दोघा तरुणांना ते शोधत होते, त्यांना भेटण्यासाठी त्यांना देण्यात आले. यावेळी त्या दोघा प्रतिनिधींना आम्ही बेपत्ता नसून घरी सांगूनच या शिबिराला आलो आहोत, असे त्यांना लेखी लिहून दिले, त्यामुळे ते माघारी फिरले. मात्र यात कॉंग्रेसचे समाधान झाले नाही. त्यामुळे एनएसयुआयचे निमंत्रक सुनील कवठणकर व केपे पालिकेचे दयेश नामक नगरसेवक पोलिस स्थानकावर हजर झाले. यावेळी निरीक्षक पाटील यांना त्या विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून पोलिस स्थानकावर तुमचे पालक आल्याचे सांगितले. परंतु, यावेळी खातरजमा करण्यासाठी ते पोलिस स्थानकावर आले असता, त्याठिकाणी पालक नसून कॉंग्रेसचे सुनील व दयेश बसल्याचे आढळून आले. त्यामुळे कॉग्रेस पक्ष पोलिस यंत्रणा वापरून विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप श्री. शिरोडकर यांनी केला आहे. पोलिसांनी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, तो हस्तक्षेप विद्यार्थी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments: