फाशी: सकरु बिंजेवार, शत्रुघ्न धांदे, विश्वनाथ धांदे, रामु धांदे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर
जन्मठेप: गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांदे
दोषमुक्त: महिपाल धांदे, धर्मपाल धांदे आणि पुरुषोत्तम तितरमारे
भंडारा, दि.२४ : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या खैरलांजी प्रकरणात आज सहा जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोघांना जन्मठेप देण्यात आली आहे. न्या. स. शि. दास यांनी हा निकाल दिला. या निकालाचे दलित समाजातील नेत्यांनी स्वागत केले असून, बचाव पक्षाने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे सांगितले. ज्या कुटुंबाचे हे हत्याकांड घडले, त्या भैयालाल भोतमांगे यानेही या निकालावर आपण समाधानी असल्याचे म्हटले आहे.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेखा भोतमांगेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप तर प्रियंका, रोशन आणि सुधीर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहेे. या प्रकरणाचे पडसाद राज्य विधिमंडळ आणि संसदेपर्यंत उमटले होते. संपूर्ण राज्यात सुद्धा या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटले होते.
सुरेखा भोतमांगे हत्या प्रकरणी सर्वच्या सर्व आठही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिच्या अपत्यांच्या खुनाबद्दल इतर सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, त्यात सकरु बिंजेवार, शत्रुघ्न धांदे, विश्वनाथ धांदे, रामु धांदे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर यांचा समावेश असून, गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांदे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
गोपाल बिंजेवार हा मुलगा जन्मठेपेची शिक्षा भोगणार असून, त्याचे वडील सकरु फाशीची शिक्षा भोगणार आहेत. विश्वनाथ धांदे याला फाशी झाली असून, त्याच्या दोन मुलांपैकी एक शत्रुघ्न हा फाशीची, तर शिशुपाल हा जन्मठेपेची शिक्षा भोगणार आहेत. जगदीश आणि प्रभाकर मंडलेकर काका-पुतणे दोघेही फाशीची शिक्षा भोगणार आहेत.
विशेष न्यायालयाने सीआरपीसीच्या २३५ (२) कलमाचा वापर करीत भादंविच्या ३०२ कलमान्वये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड केला आहे. प्रियंका, रोशन, सुधीरच्या हत्येप्रकरणी एकूण सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, दोन आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शिवाय दोन हजार रुपयांचा दंड केला आहे. हा दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. भादंविच्या १४८ आणि १४९ कलमान्वये तीन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींना भादंविच्या २०१ कलमान्वये सुद्धा दोषी धरण्यात आले होते. पण, त्यांना ३०२ कलमान्वये शिक्षा झालेली असल्याने या कलमान्वये होणाऱ्या शिक्षेचे विलीनीकरण ३०२ मध्येच करण्यात आले आहे.
या सर्व आरोपींना गेल्याच सोमवारी भादंविच्या ३५४, ४४९ या कलमातून (ऍट्रॉसिटी) मुक्त करण्यात आले होते. महिपाल धांदे, धर्मपाल धांदे आणि पुरुषोत्तम तितरमारे यांना दोषमुक्त करण्यात आले होते. आजच्या आदेशात हे तिघे अन्य कुठल्याही गुन्ह्यात आरोपी नसतील, तर त्यांना कारागृहातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. या सर्व शिक्षा सलग राहणार आहेत. या प्रकरणात जे कपडे, शस्त्र जप्त करण्यात आले होते, ते नष्ट करण्यात यावे. जप्त करण्यात आलेले बैल आणि बैलगाडी ज्यांचे आहेत, त्यांना परत करण्यात यावेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल हॅंडसेट भैयालाल भोतमांगे यांना देण्यात यावेत, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात सहा जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली असल्याने हे प्रकरण शिक्षानिश्चितीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात यावे, असेही त्यात म्हटले आहे. या प्रकरणात अखेर निकाल लागल्याने संपूर्ण राज्याने सुटकेचा श्वास टाकला आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. सुदीप जयस्वाल, ऍड. नीरज खांदेवाले यांनी, तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले. भैयालाल भोतमांगे यांच्यातर्फे ऍड. योगेश मंडपे यांनी काम पाहिले.
Thursday 25 September, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment