Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 September, 2008

संपूर्ण गोव्यात "रेड अलर्ट' जारी

रेल्वे, बसस्थानकांवर कडक सुरक्षा; लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन
पणजी, दि. २२ (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत अटक केलेल्या अतिरेक्यांनी गोव्यातील स्फोटांचा उघड केलेला कट, गुप्तचर यंत्रणा व केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनही गोव्याला कमालीच्या सावधगिरीच्या सूचना मिळाल्यानंतर संपूर्ण गोव्यात आज "रेड ऍलर्ट' जारी करण्यात आला. रेल्वे व बसस्थानक तसेच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व सतर्क करण्यात आली आहे. चर्च, मंदिरे, मशीद व गुरूव्दारासारख्या धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांनाही खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेसंबंधी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश गृह खात्याच्या निर्देशानंतर पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, या रेड ऍलर्टमुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी पोलिस तत्पर असावेत या हेतूनेच रेड ऍलर्टचा सराव केला जात असल्याची सारवासारव पोलिस महासंचालक ब्रजेंद्रसिंग ब्रार यांनी गृहमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
काल दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्यांनी गोव्यातील आपला घातपात घडवून आणण्याचा कट उघड केला होता. त्याआधी शुक्रवारी जयपूरहून निघालेली मरूसागर एक्सप्रेस सोमवारपर्यंत उडविण्याची अतिरेक्यांनी धमकी दिल्यानंतर काल गोव्यात स्फोट घडविण्यासाठी केरळहून रेल्वेतून स्फोटके किंवा अतिरेकी गोव्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या एकंदर घडामोडींत गोव्याला कमालीची सतर्कता बाळगण्याच्या सूूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कालपासूनच महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळांवर, रेल्वेस्थानकावर व विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. आज सकाळी गृह मंत्र्यांनी पोलिस खात्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर लगेचच दुपारी पोलिस महासंचालकांनी "रेड ऍलर्ट'चा आदेश जारी केला आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली.
त्यांच्या या आदेशानंतर गोव्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची त्यातील व्यक्तींसह सीमा नाक्यांवर कसून तपासणी चालू झाली आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही सुरू करण्यात आली असून संशयित व्यक्तीची सखोल चौकशी करण्याच्या सूचना सीमा नाक्यावरील पोलिस स्थानकांसह इतर पोलिस स्थानकांच्या प्रमुखांना आणि नाकाबंदी व गस्तीवरील पोलिसांना करण्यात आल्या आहेत. बसस्थानक तसेच बाजार परिसर व सार्वजनिक ठिकाणी साध्या वेषातील पोलिस टेहळणीच्या मोहिमेवर पाठवण्यात आले आहेत. शिवाय काही साध्या वेशातील पोलिसांना ठिकठिकाणी फेरफटका मारून स्थितीचा आढावा घेण्यास बजावण्यात आले आहे.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने येथील किनारे, मंदिर, चर्चेस इत्यादी धार्मिक स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मोक्याची ही ठिकाणे अतिरेकी आपले लक्ष्य ठरविण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चर्च धर्मगुरू व मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही तेथे येणाऱ्या पर्यटकांवर बारीक नजर ठेवण्याची व प्रत्येक पर्यटकांची कसून छाननी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंदिर व चर्चेसमध्ये क्लोज्ड टीव्ही सर्किट कॅमेरे बसविण्यास सांगण्यात आले असून प्रवेशव्दारावर मेटल डिटेक्टर बसविण्याचे व प्रशिक्षित खाजगी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी संबंधित व्यवस्थापनाला केले आहे.
कळंगुट, कांदोळी, कोलवा, पाळोळे, हरमलसारखे किनारी भाग हे पर्यटकांच्या गर्दीचे असल्याने बॉंबस्फोटाच्या कटात या जागा हिटलिस्टवर असण्याची शक्यता गृहीत धरून किनारी भागातील पोलिसांनाही अधिक दक्ष राहाण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय या भागात समाज विघातक कारवाया होत असल्यास त्यांच्या माहितीचीही जमवाजमव करण्यास त्यांना बजावले आहे. चित्रपटगृहे, प्रेक्षागृह, नृत्यमंच, डिस्कोथेक, मनोरंजन क्लबांनाही सुरक्षा उपाय होती घेण्यास पोलिसांनी सांगितले आहे. सांतइनेज येथील पुरातत्व खात्याचे जिल्हा पर्यवेक्षकांना संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहाण्याचा सूचना करण्यास पोलिसांनी सांगितले असून आवारात कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
जलसफरीवर निघणाऱ्या नौका, कॅसिनो बोटी, बेती येथील गुरूद्वारा, कला अकादमी, पर्यटन खाते आदींनाही सतर्क करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावण्यासाठी प्राथमिक स्तरावर आवश्यक ती खबरदारी घेण्यास त्यांना सांगितले आहे.
रेल्वेतून स्फोटके किंवा अतिरेकी गोव्यात येण्याची माहिती मिळाल्याने रेल्वे गाड्यांची सरसकट तपासणी आजपासून होती घेण्यात आली आली आहे. बॉंब निकामी करणारे पथक व पोलिस श्वानपथक रेल्वेगाड्यांच्या तपासाच्या कामात व्यग्र आहे. नागरिकांना एखादी संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरीत १०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.
गोवा पोलिसांकडे बॉंब निकामी करणारे केवळ एकमेव पथक आहे. सध्या हे पथक रेल्वे गाड्यांच्या तपासात गुंतल्याने पोलिसांची कुचंबणा झाली आहे. "तहान लागल्यावर विहीर खोदावी' त्यानुसार पोलिस खात्याने आपल्या ताफ्यात आणखी दोन बॉंम्ब निकामी करणाऱ्या पथकांची भर घालण्यासाठी आता हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच दहशतवादविरोधी गुन्हे हाताळण्यासाठी विशेष पथकही तयार केले जाणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांच्यावर या पथकाच्या स्थापनेची जबाबदारी सोपविण्यात आली असून हे पथक विविध राज्यातील दहशतवादी घटनांची इत्यंभूत माहिती ठेवेल. देशपांडे यांना त्यासाठी मुंबई, दिल्ली अशी ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यातही आले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. अतिरेकी कारवायांच्या शक्यतेने गोवा पोलिसांची झोप उडाल्यानंतर हा कक्ष स्थापन करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
योग्य ती खबरदारी घेतलीय - रवी
दिल्लीत अटक केलेल्या अतिरेक्यांनी गोव्यात स्फोट घडविण्याच्या उघड केलेल्या कटाची कोणतीही माहिती अद्यापही गोवा सरकारला आलेली नाही. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आल्यामुळे केवळ खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वत्र सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री रवी नाईक यांनी केले आहे. गोवा ही देवदेवतांची भूमी आहे. आजवर देवदेवतांच्या आशीर्वादाने गोवा हा तसा शांत राहीला असून ही शांतता कायमची टिकवून ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. गोव्यात "सीमी' च्या कारवाया सुरू असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.

No comments: