Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 September, 2010

काश्मीरमध्ये हिंसेत १२ ठार; १० जखमी

श्रीनगर, दि. १३ : काश्मीर खोऱ्यात आज अनेक ठिकाणी संतप्त जमावाने हिंसक घटना घडवून आणल्या. जमावाने एका खाजगी शाळेला आग लावून दिली तसेच रेल्वेेसंपत्तीचे नुकसान केले.
श्रीनगर येथून ४५ किमी अंतरावरील बांदिपोरा जिल्ह्यातील अजास येथे सुरक्षा दलांवर जबर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने गोळीबार करावा लागला. त्यात निसार अहमद भट नावाचा युवक ठार झाला, तर तीन जण जखमी झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. भटच्या मृत्यूने गेल्या ९५ दिवसांपासून खोऱ्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७२ लोक मृत्युमुखी पडले आहेत. आज एकाच दिवशी १२ जण मृत्युमुखी पडले.
सुरक्षा जवानांवर जबर दगडफेक करण्यापूर्वी प्रक्षुब्ध जमावाने रेल्वेची एक छोटी इमारत तसेच एका विशिष्ट समुदायाचे रिकामे घर जाळून टाकले. अनंतनाग जिल्ह्यातील खन्नाबल येथे दगडफेक करणाऱ्या जमावाचा पाठलाग करताना सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले तर अशाप्रकारची घटना पारिपोरा पोलिस ठाण्याजवळ घडली असता पोलिस गोळीबारात तेथे तीन जण जखमी झाले.
आणखी काही भागांत संचारबंदी लागू
दरम्यान, आज खोऱ्यातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याने तसेच फुटीरतावाद्यांनी निषेध मोर्चाचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील आणखी काही भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे.
बडगाम जिल्ह्यातील काही भागांत तसेच पुलवामा जिल्ह्यातील तीन शहरांत खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यातील संचारबंदीत आज सकाळी काही काळासाठी शिथिलता देण्यात आली परंतु त्यासाठी फार कडक निर्बंध लावण्यात आले. अशाच प्रकारचे निर्बंध पट्टान, गंदेरबाल व कुपवाडा शहरातही लावण्यात आले आहेत. सोनावार येथील संयुक्त राष्ट्र लष्करी निरीक्षक गटाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याची योजना हुरियत नेत्यांनी आखली आहे. त्याकडे बघता या भागात जारी करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी ही अतिशय कठोरतेेने केली जात आहे.

No comments: