Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 September, 2010

केंद्रातील संपुआ सरकार कणाहीन आणि निष्क्रिय

काश्मिरप्रश्नी अडवाणी कडाडले
नवी दिल्ली, दि. १४ : काश्मीरमधील वाढत्या हिंसेवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले असतानाच, आज भाजपने आपली भूमिका स्पष्ट करताना, कणाहीन आणि निष्क्रिय संपुआ सरकारमुळे आजची स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट या कायद्यात कोणतीही दुरुस्ती करून तो शिथिल करण्याला भाजप कडाडून विरोध करील, असे आज स्पष्ट करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज पक्षप्रवक्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची ठोस भूमिका जनतेपर्यंत नेण्याचे आवाहन केले. सध्या देशातील स्थिती खालावली असून, काश्मिरात तर कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेल्याचे सांगून, अडवाणी यांनी काश्मीरमध्ये सरकार नावाची चीजच राहिलेली नाही, अशी टीका केली. फुटीरतावाद्यांसमोर राज्य सरकारने लोटांगण घातल्याचे चित्र सध्या दिसते आहे, असे ते म्हणाले. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांपुढे केंद्र सरकार नांगी टाकेल, असा भाजपचा कयास खरा ठरत असल्याचे सांगून, फुटीरतावाद्यांना धडा शिकविण्याऐवजी "राजकीय तोडग्या'ची भाषा बोलली जात आहे. सशस्त्र दलांना अधिकार देणारा कायदा मागे घेणे अथवा त्यात दुरुस्ती करणे म्हणजे पाकिस्तानच्या कटाला बळी पडण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या प्रयत्नांमुळेच तेथील सशस्त्र दलांना १९५३ पासून अधिक अधिकार मिळत गेले. आता त्याबाबत माघार घेणे अनुचित आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.

No comments: