टोळीच्या म्होरक्याकडून धक्कादायक माहिती उघड
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): संपूर्ण गोव्यात दहशत माजवण्यासाठीच मायकल फर्नांडिस याने "गॅंग' बनवली होती. ऐन चतुर्थीच्या काळात शिवोली, तसेच पणजीतील काही बंगल्यांवर दरोडे टाकून करोडो रुपयांची मालमत्ता चोरण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी काही बंगल्यांचे रीतसर सर्वेक्षण करून आराखडाही आखला होता. गरज पडल्यास विरोध करणाऱ्यांची हत्या करून हे दरोडे सफल करायचे, याच उद्देशाने इंदूर येथे जाऊन रिव्हॉल्वरची खरेदीही केली होती. मात्र, त्यांचे हे मनसुबे पूर्ण होण्यापूर्वीच ही टोळी गजाआड झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चार महिन्यांपूर्वी ही "गॅंग' बनवण्यासाठी मायकल यांनी प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. एका राजकीय व्यक्तीचा नातलग असलेला मायकल हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने काही वर्षापूर्वी त्याला घरातून हाकलण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या अट्टल गुन्हेगाराचे डाव उघडकीस आल्याने त्यांच्याकडून मिळत असलेली माहिती ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. शिवोली येथील अनेक बंगले त्यांच्या निशाण्यांवर होते. त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसापासून शिवोली येथे मुक्काम ठोकला होता.
चतुर्थीचा लाभ उठविण्याचा इरादा!
गणेश चतुर्थीला काही लोक आपले घर बंद ठेवून अन्य ठिकाणी जात असल्याने त्याचाच फायदा उठवून हे दरोडे टाकण्याचा बेत आखला होता, अशी माहिती मायकल याच्याकडून पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत या टोळीने एक खून आणि चार दरोडे टाकले असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन रिव्हॉल्वर आणि २३ राऊंड बुलेट जप्त केले आहे. यातील दोन राऊंड बुलेट त्यांनी गोळी झाडण्याची प्रात्यक्षिक करण्यासाठी वापरले आहेत. वास्को येथील बोगमाळो किनाऱ्यावर त्यांनी "सुलेमान' या तरुणाकडून गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.
न्यायालयीन कोठडीत एकत्र आल्यावर तयार झालेल्या या टोळीसाठी लागणारी हत्यारे, रिव्हॉल्वर घेण्यासाठी त्यांना पैशांची गरज भासत होती. त्यामुळे पहाटे व सायंकाळच्यावेळी एकटे दुकट्या आढळून येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावण्याचे सत्र त्यांनी सुरू केले होते. त्याचप्रमाणे, बेळगाव येथील एका मित्राला हाताशी धरून दरोडा टाकला. यात त्यांच्या हाती आठ लाख रुपये लागले. येथून ते मौजमजा करण्यासाठी हैदराबाद येथे गेले. येथून गोव्यात परतत असताना भाड्याने क्वालीस गाडी केली. अंकोला येथे पोचल्यावर त्याचा वाहन चालकाचा गळा दाबून व डोक्यावर मोठा दगड घालून त्याला खून करण्यात आला. ती क्वालीस गाडी त्यांनी बेळगाव येथे एकाला ३५ हजार रुपयांना विकली असल्याची माहिती त्यांच्या तपासात बाहेर आली आहे.
----------------------------------------------------------
सोळा जणांची टोळी...
विविध गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुण गुन्हेगारांना बरोबर घेऊन ही टोळी बनवण्यात आली होती. सर्वांची गाठभेट ही न्यायालयीन कोठडीतच झाली होती. तेथेच सोळा जणांनी अशा प्रकारची टोळी बनवण्याचा निर्णय घेऊन बाहेर पडल्यावर ते या कामाला लागले होते. या टोळीद्वारे खून, धमक्या, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा आराखडा त्यांनी आखला होता.
Tuesday 14 September, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment