Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 September, 2010

नटरंग,"थ्री इडियटस्'ची राष्ट्रीय पुरस्कारांत बाजी

अमिताभ आजही शहेनशहा

नवी दिल्ली, दि. १५ - भारतीय चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ५७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली, त्यात मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान "नटरंग' ला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट म्हणून बहुचर्चित "थ्री इडियटस्' ने पुरस्कार पटकावला. "पा'मधील भूमिकेबद्दल सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपण आजही चित्रपटसृष्टीचे शहेनशहा असल्याचे दाखवून दिले.
अतुल कुलकर्णीचा समर्थ अभिनय,अजय-अतुलचे अफलातून संगीत, त्यावरची तितकीच बहारदार नृत्ये आणि दमदार कथानक, या जोरावर मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या "नटरंग' ने आज आपला अस्सल मराठमोळा रंग दाखवला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान "नटरंग' ने पटकावला आणि मराठी लोकसंगीताची तुतारी राजधानीत दुमदुमली.
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी यंदा तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. "अग्निपथ' आणि 'हम' नंतर "पा' या चित्रपटातील दणदणीत अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.याच चित्रपटातील भूमिकेसाठी अरुंधती नाग यांनी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. फारुख शेख यांच्या "लाहोर'मधील भूमिकेलाही परीक्षकांनी दाद दिली असून सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून त्यांची निवड झाली आहे.
रॅंचो, त्याचे मित्र, चतूर आणि विरू सहस्रबुद्धे यांनी सिनेप्रेमींना हसवले, रडवले, अक्षरशः वेड लावले, त्या "थ्री इडियट्स'च्या भन्नाट लोकप्रियतेची प्रचिती राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही आली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच,"बेहती हवा सा था वो'या गाण्यासाठी स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट गीतकार ठरले. अनुराग कश्यपच्या देव-डी या चित्रपटाचा संगीतकार अमित त्रिवेदीने इतर संगीतकारांना मागे टाकलं. श्याम बेनेगल यांचा "वेल डन अब्बा' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला, तर ओमप्रकाश मेहरांच्या "दिल्ली-६'ने राष्ट्रीय एकता पुरस्कार पटकावला.
"कुट्टी श्रांक' या मल्याळम चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर मोहर उमटवली. त्याशिवाय सिनेमॅटोग्राफी, पटकथा आणि वेशभूषा या गटातही त्यानेच बाजी मारली 'अबोहोमान' या बंगाली सिनेमाची नायिका अनन्या चॅटर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली, तर ऋतुपर्णो घोष सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराचा मानकरी ठरला. परीक्षक मंडळाचे प्रमुख रमेश सिप्पी यांनी नवी दिल्लीत या सर्व पुरस्कारांची घोषणा केली.

No comments: