Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 January, 2010

मुख्यमंत्री व बंडोबांनाही कॉंग्रेसश्रेष्ठीनी फटकारले

राजकीय धुसफुस मात्र कायम
मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): गोव्यात सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वरचेवर होणाऱ्या बंडाळीमुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच बंडखोर नेत्यांना बरेच चापल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
गेले चार दिवस राज्यात राजकीय खलबतांनी जी काही अचानक उचल खाल्ली व कॉंग्रेसेतर "ग्रुप ऑफ सेव्हन व कॉंगे्रस पक्षातील काही आमदारांनी उघडपणे नेतृत्व बदलाची मागणी केली त्यावरून श्रेष्ठी बरेच संतापल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विरोधक शांत असताना सरकाराअंतर्गतच वाद निर्माण करून सरकारची बदनामी सुरू आहे व त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यास अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री कामत यांना श्रेष्ठींनी बरेच सुनावल्याचीही खबर आहे. केंद्रात तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याचा विषय पेटला आहे. अशावेळी विनाकारण आपापसातील वादाला जाहीर स्वरूप देऊन क्लेश निर्माण करण्याचा हा प्रकार श्रेष्ठींसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचेही यावरून स्पष्ट झाले आहे. दिल्ली येथे अर्थमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आलेख श्रेष्ठींनी घेतल्याची खबर आहे.
कामत यांनी मुख्यमंत्र्यांची धुरा सांभाळल्यानंतर " गोव्यातच वरचेवर ही मागणी उसळी कां घेते , तुम्ही राज्याला सक्षम नेतृत्व देऊ शकत नाही का असा सरळ सवाल केला व यापुढे असे प्रकार चालणार नाहीत , कारण प्रश्र्न फक्त गोव्याचा नाही अन्य राज्यांचाही आहे ' असे बजावले असे कळते.
श्रेष्ठींकडून अशा प्रतिक्रियेची कामत यांना अपेक्षा नव्हती व त्यामुळेच दाबोळी विमानतळावर ते पडलेल्या चेहऱ्यानेच उतरले व पत्रकारांकडे जास्त वेळ न थांबता सरळ निघून गेले. रात्री त्यांनी पणजीत न राहता सरळ मडगावचा रस्ता पकडला.
दुसरीकडे प्रत्येक वेळी सरकारविरुद्ध होणाऱ्या हालचालीत आरोग्यमंत्र्यांचाही पुढाकार असतो याची दखलही दिल्लीने घेतली आहे . ते अपक्ष असतानाही मंत्रिमंडळात त्यांना दिलेले स्थान व त्यांंच्या प्रत्येक प्रस्तावाची पूर्ती होत असूनही बंडखोरांच्या गोटात त्यांचा असलेला वावर, असंतुष्टांना मिळालेले बळ या सर्व घटना गांभीर्याने घेऊन आठवडाभरात गोव्यातील राजकीय स्थितीबाबत काही महत्त्वाचे निर्णय श्रेष्ठी घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या दिल्लीत असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनाही आज हरिप्रसाद यांनी पाचारण करून शिस्तीचे धडे दिले व भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असल्याचे कळते.
"साम, दाम आणि दंड'चा प्रत्यय
"साम, दाम व दंड'नीतीचा वापर करीत कॉंग्रेस पक्षाने आपल्या नेहमीच्या पद्धतीने काही बंडखोरांची समजूत काढीत चुचकारण्याचा आज प्रयत्न केला, तर काहींना कारवाईची भीती दाखवत आवरण्याची क्लृप्ती वापरली. त्यामुळे आघाडी सरकाराअंतर्गत निर्माण झालेली बंडाळी थंडावल्यात जमा झाल्याची चर्चा आज राजधानीत सुरू होती. "ग्रुप ऑफ सेव्हन' मधील महत्त्वाचे घटक समजले जाणारे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर "सीबीआय' आरोपपत्राचा ससेमिरा लावून त्यांना वेसण घालण्यात आली. या घटनेची या गटातील उर्वरित सदस्यांनीही धडकी घेतल्याचे समजते. कॉंग्रेस पक्षातील बंडखोर गटात उफाळलेला असंतोषही काही प्रमाणात दूर करण्यात आला. पांडुरंग मडकईकर यांची भेट प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी घेतली व त्यांचे दुखणे कमी करण्याचे ठोस आश्वासन त्यांना दिले आहे, असेही कळते. बाकी दयानंद नार्वेकर व आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही दिगंबर कामत यांची भेट घेतली. कला अकादमीच्या दर्या संगमवर अखिल भारतीय साहित्य व संस्कृती संमेलनात नार्वेकर व कामत यांची भेट झाली व तिथेच त्यांच्यातील मतभेदांचा अस्त झाल्याचीही चर्चा सुरू होती. बाकी दिगंबर कामत यांनी धोका टळला असे सांगितले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता मात्र स्पष्टपणे जाणवत होती. उद्या १६ रोजी कॉंग्रेस पक्षातील बंडखोरांची बैठक होणार आहे व त्यात ते आपली भूमिका ठरवतील, अशी माहिती आमदार मडकईकर यांनी पत्रकारांना दिली.

No comments: