Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 January, 2010

संस्कारक्षम घर हेच आद्यविद्यापीठ - विवेक घळसासी

पर्वरी, दि. ९ (प्रतिनिधी)- बदलत्या काळाचा परिणाम म्हणून आता एकत्रित कुटुंब व्यवस्था राहिलेली नाही, याची खंत न बाळगता अथवा निराश न होता छोट्या कुटुंबात असलेल्यांची मने किती एकत्रित आहेत आणि ती तशी कशी राहतील, याचाच अधिक विचार करा, असे आवाहन आज नामवंत वक्ते विवेक घळसासी यांनी केले. आपले घर हे आद्यविद्यापीठ आहे, मुलांना शाळेत शिकवले जाते पण त्यांना शहाणपण मात्र घरातच मिळते, याचे सदैव स्मरण ठेवून त्यानुसार वर्तन ठेवा, असे ते म्हणाले. पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी संकुलात आयोजित शारदा व्याख्यानमालेत अखेरचे पुष्प गुंफताना ते "मुके होत चालली घरे' या विषयावर बोलत होते.
विद्यमान स्थितीवर भाष्य करताना श्री. घळसासी म्हणाले, इंटरनेटद्वारा सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त होत आहेत आणि बहुतेक व्यवहार आता घरबसल्या होऊ लागले आहेत, सध्या हे सुखदायक वाटले तरी माणूस माणसापासून दुरावत चालला आहे आणि काही वर्षांनी त्याला हे एकाकीपण असह्य होईल. जग ज्यावेळी संभ्रमावस्थेत असेल त्यावेळी मार्ग दाखविण्याची जबाबदारी आपल्या देशावर असेल, यासाठी मुकी होत जाणारी घरे संस्कारांनी कशी पुन्हा एकदा बोलकी होतील याचा आत्तापासूनच विचार व्हायला हवा. सध्या बडबड चालते पण बोलणे होत नाही, काही वेळा बोलणे चालू असते पण सुसंवाद होत नाही. अशा स्थितीत संस्कारांना अतिशय महत्त्व आहे, पण संस्कार म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हेत. कृतज्ञता, सहजीवन, परिश्रमाची तयारी आणि संयम हे आवश्यक गुण बिंबवणारे घरातील वर्तन म्हणजेच संस्कार हे आपल्या पूर्वजांनी आपल्या आचरणातूनच दाखवून दिले आहे. खरे तर लोकसंस्कृतीमधील रीत हाच संस्काराचा पाया आहे.
भौतिक सुखाची माणसाची ओढ समजण्यासारखी आहे, भौतिक, मानवी व तांत्रिक विकास ही काळाची गरज आहे, त्यात मागे राहून चालणार नाही पण त्याचबरोबर माणसाला माणूस ठेवण्याची भारतीय कुटुंबाची क्षमता लयाला जाणार नाही, याचीही दक्षता घ्यायला हवी,असे घळसासी म्हणाले.
प्रमुख पाहुणे दै. गोमन्तकचे कार्यकारी संपादक सुरेश नाईक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर बिपीन नाटेकर व प्रा. भिवा मळीक उपस्थित होते.प्रा. महेश नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. गुरुप्रसाद पावस्कर यांनी आभार मानले. भारत विकास परिषद व जनहित मंडळ, पर्वरी यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला तीनही दिवस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

No comments: