Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 January, 2010

निष्क्रिय सरकार बरखास्त करा भाजप नेत्यांची मागणी

पणजी, मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारकडून राज्याचे वाटोळे सुरू आहे. सरकारातील भ्रष्ट कारभाराचा वारंवार पुनरुच्चार करून अनेक गैरप्रकारही उघडकीस आणले व हे सरकार निष्क्रिय आहे हे देखील उघड करून दिले. आता खुद्द सरकारातीलच नेते स्वतःच्याच सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत असल्याने राज्याला वाचवायचे असेल तर हे सरकार तात्काळ बरखास्त करून नव्याने निवडणुकांना सामोरे जाणेच योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज व्यक्त केली. मडगाव येथे बोलताना प्रदेश भाजपाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनाही असेच मत व्यक्त केले आहे.
राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. आघाडी सरकाराअंतर्गत वाद विकोपाला पोहचला असून नेतृत्व बदलाचेही वारे वाहत आहे. या एकूण राजकारणात भाजपला अजिबात रस नाही व भाजपचा या घटनांशी अजिबात संबंध नाही, असे स्पष्टीकरण पर्रीकर यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर स्वीकारणार काय,असा सवाल केला असता पर्रीकर यांनी लगेच नकार दिला. गोमंतकीय जनता भाजपला पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याची संधी देईल तेव्हाच नेतृत्व स्वीकारू,असेही यावेळी पर्रीकर यांनी सांगितले.सध्याच्या परिस्थितीत विधानसभा विसर्जित करणेच राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल,असे मतही पर्रीकर यांनी व्यक्त केले.
बारांचा गट बारा वाजविणार!
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनीही पर्रीकरांप्रमाणेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या "ग्रुप ऑफ सेव्हन' चा जो काही खेळ सुरू आहे तो आता "ग्रुप ऑफ ट्वेल्व '(बारा) वर पोहचलेला आहे. हा गट सध्या आपल्याच सरकारचे "बारा' वाजवण्यास पुढे सरसावलेला आहे. या राजकारणात भाजपला स्वारस्य नाही, असे स्पष्टीकरण श्री. नाईक यांनी दिले. अशा परिस्थितीत सरकार स्थापण्यापेक्षा भाजप विधानसभा विसर्जनाची मागणी करेल व नव्याने निवडणुकांना सामोरे जाणे पत्करेल असेही श्री.नाईक म्हणाले.
सध्या केवळ स्वार्थाचे राजकारण सुरू झाले आहे. राज्याच्या विकासाचे कुणालाही पडून गेलेले नाही व प्रत्येक नेता आपले ईप्सित साध्य करण्यासाठीच धडपडत आहे. अशा परिस्थितीत या नेत्यांना पाठबळ देण्यात भाजपचा विश्र्वास नाही. सध्या जे काही घडते आहे ते जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कॉंग्रेसच्या हातात सत्ता देऊन जनतेने काय चूक केली याचे प्रदर्शनच सध्या सुरू आहे. कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही तोपर्यंत राज्याचा विकास शक्य नाही हे देखील यानिमित्ताने स्पष्ट झाल्याने सुज्ञ गोमंतकीय जनता या गोष्टीची खूणगाठ करून भविष्यात सत्तेची सूत्रे भाजपकडेच देतील, असा आत्मविश्वासही खासदार नाईक यांनी व्यक्त केला.

No comments: