Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 January, 2010

जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करा

पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांचे आवाहन

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - राज्यातील जत्रोत्सव किंवा इतर धार्मिक उत्सवांनिमित्त आयोजित केला जाणारा जुगार हा प्रत्यक्षात सामाजिक प्रश्न आहे. त्याबाबत मोठ्या प्रमाणात चळवळ व जागृतीची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केली. या जुगारावर कारवाई करताना पोलिसांवर अनेक बंधने येतात व काही प्रमाणात कारवाई केलीच तर त्याला धार्मिकतेचा रंग दिला जातो,असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात विविध ठिकाणी धार्मिक उत्सव व खास करून जत्रोत्सव, कालोत्सव, वर्धापनदिन साजरे करताना जुगार आयोजिणे ही प्रथाच बनली आहे. खुद्द देवस्थान समित्यांचीच या जुगाराला मान्यता असते. स्थानिक पंचायत व नागरिकांचाही या प्रकाराला उघड पाठिंबा असतो. बॉस्को जॉर्ज यांनी अलीकडेच माहिती हक्क कायद्याअंतर्गत एका व्यक्तीला दिलेल्या माहितीत पोलिसस्थानक क्षेत्रात जुगारावर पूर्ण बंदी असल्याचे म्हटले आहे. जत्रोत्सवांत जुगार चालत नाही व जिथे जुगार चालतो तिथे पोलिस तात्काळ कारवाई करतात,असेही त्यांनी या माहितीत सांगितले आहे. प्रत्यक्षात नेमकी उलटी स्थिती आहे. या उजळमाथ्याने हा जुगार खेळला जात आहे. जुगाराबरोबर व्यसन व गुन्हेगारी प्रवृत्तीही बळावत चालल्याने हा गंभीर विषय बनत आहे. या जुगाराबाबत त्यांना विचारले असता याप्रकरणी कारवाई करण्यावर पोलिसांवर प्रचंड दडपण येत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रामुख्याने पेडणेतील जुगाराबाबत बोलताना तिथे कारवाई करणेही कठीण बनले आहे. आपण किंवा म्हापशाचे उपअधीक्षक कारवाई करण्यास गेलो तर त्याला धार्मिकतेचा रंग चढवला जाईल व नंतर हे प्रकरण पोलिसांवरच उलटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आता खरोखरच समाजाचाच या प्रकाराला विरोध असेल व त्यांनी पुढाकार घेतला तर पोलिस त्यांना पूर्णपणे सहकार्य करतील व त्यांच्या सुरक्षेची हमी घेतील,असेही त्यांनी नमूद केले.
मंदिरांचे पवित्र्य राखा ः राजेंद्र वेलिंगकर
धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने जुगार आयोजित करण्याची प्रथा तशी जुनीच आहे; पण अलीकडच्या काळात राज्यात अनेक देवस्थाने आहेत की त्यांनी ही प्रथा बंद पाडली आहे. त्यासाठी ती कौतुकास पात्र असल्याची प्रतिक्रिया मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रित राजेंद्र वेलिंगकर यांनी दिली. मंदिरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी मंदिरांचे पावित्र्य व सुरक्षा यांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मंदिर सुरक्षा समिती कार्यरत आहेच, असेही त्यांनी सांगितले.
जशी राजकीय नेत्यांची निवड होते त्या धर्तीवरच देवस्थान समित्याही नेमल्या जातात.राजकीय नेते जसे निवडून आल्यानंतर आपला स्वार्थ पाहतात त्याच पद्धतीने काही ठरावीक देवस्थान समित्यांचाही व्यवहार चालतो; पण त्यासाठी केवळ देवस्थान समित्यांवर दोषारोप करून चालणार नाही तर प्रत्येक महाजन,भक्त यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे. आपली कुलदैवत किंवा ग्रामदैवत याची पवित्रता जपणे ही प्रत्येक महाजन व भक्तगणाची जबाबदारी आहे.जुगारामुळे कुणाचे भले झाल्याचे एकही उदाहरण नाही, त्यामुळे या प्रकाराला कितपत थारा द्यावा हे प्रत्येकाने ठरवावे. राज्यातील अनेक देवस्थान समित्या अनेक लोकोपयोगी व सामाजिक कामांत सक्रिय आहेत. देवस्थानेच जर जुगारांना प्रोत्साहन देऊ लागली तर समाजाची कशी अवनती होईल याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे, असेही त्यांनी बोलून दाखवले.

No comments: