Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 January, 2010

'संपुआ' सरकार थैलीशहांचे एजंट

महागाईच्या विषयावरून मायावती कडाडल्या
लखनौ, दि. १४ : भाववाढीबद्दल राज्य सरकारांवर खेकसणाऱ्या केंद्र सरकारला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी कडक शब्दांत खडसावले आहे. केंद्रातील सरकार भांडवलशहांच्या हातचे बुजगावणेबनले असून जर महागाई रोखण्यात त्याला यश आले नाही तर केंद्राविरुद्ध आपल्याला देशव्यापी मोहीम हाती घ्यावी लागेल, असा सणसणीत इशारा मायावती यांनी दिला आहे. आज येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. थैलीशहा आणि बडे व्यावसायिक यांचे उखळ पांढरे करणे हाच केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा अजेंडा आहे. आकाशाला भिडलेली महागाई म्हणजे या सरकारच्या सपशेल चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिपाक आहे. सतत दिशाभूल व गोंधळमय विधाने करून केंद्रातील मंत्री साठेबाज, नफेखोर, काळाबाजारवाले आणि दलालांना प्रोत्साहन देत आहेत. या मंडळींविरुद्ध त्यांना वेळीच कारवाई करण्यात साफ अपयश आले आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मायावती यांनी विशेष समाचार घेतला. त्या म्हणाल्या, पवार हे गेल्या काही महिन्यांपासून अशी विधाने करत आहेत की, केवळ त्यामुळेच साठेबाज आणि काळाबाजर करणाऱ्यांची चंगळ सुरू आहे. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी संपुआ सरकारने इंधनाच्या दरात केलेली कपात म्हणजे निव्वळ धूळफेक होती. सत्ता ताब्यात घेताच या सरकारने भांडवलशहांच्या दडपणाखाली नमून लगेच या किंमती मूळ स्तरावर आणून ठेवल्या. तसेच देशातील अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन गहू आणि तांदुळ यांच्या निर्यातीवर केंद्राने त्वरित बंदी घालायला हवी होती. तसे न झाल्याने देशात चलनफुगवटा वाढला आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात झाली.
धान्य आणि साखरेची आयात करताना आयातकरातून सवलत देण्याच्या निर्णयाला विलंब करण्यात आल्यामुळे त्यातून महागाईला खुले निमंत्रणच मिळाले. "आम आदमी साथ पुंजिपतियोंके साथ' हेच या सरकारचे धोरण बनले आहे. याच्या उलट उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाज आणि दलालांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आम आदमीला सर्वतोपरी दिलासा देण्यासाठी माझे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नरत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

No comments: