Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 January, 2010

सत्तरीमध्येही जत्रोत्सवात जुगार पोलिसांसमोर आव्हान!

वाळपई, दि. १३ : पेडणे पाठोपाठ सत्तरी तालुक्यातील देवस्थानांच्या अनेक जत्रोत्सवामध्ये डोळ्यांदेखत गेल्या अनेक वर्षापासून जुगार चालत असून या जुगाराने वाळपई पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. सत्तरी तालुक्यात अपवादात्मक गोष्टी सोडल्यास अनेक देवस्थानांच्या जत्रोत्सवावेळी जुगार चालतो. यंदाच्या जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जुगार दिसून आला असून काही जत्रोत्सव तर जुगारासाठीच चालतात असे सध्याचे चित्र दिसत आहे.
जुगार चालविणाऱ्यांचे हात मोठ्या धेंडापर्यंत असल्याने या तालुक्यात जत्रोत्सवात चालणाऱ्या जुगारावर अजूनपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. बऱ्याच प्रमाणात या जुगाराकडे तरुण पिढी व शालेय विद्यार्थी वळत असून तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचा ठेका घेतलेले लोकप्रतिनिधी मात्र याकडे मुद्दामहून कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे. हल्लीच एका जत्रोत्सवाच्या वेळी पोलिसांच्या समक्ष जुगार सुरू असून सुध्दा कोणतीच कारवाई झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. जुगाराची तयारी जुगारवाले जत्रोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी पाचपासून करायला सुरुवात करतात. ज्या ठिकाणी जत्रा असते त्याठिकाणी जुगारासाठी जागा अडविण्यासाठी जुगारवाले आच्छादने मांडून आदल्या दिवशीच जागा अडवितात. वाळपईत एक प्रसिद्ध कालोत्सव जुगारासाठीच म्हणून दोन दिवस चालतो. या कालोत्सवात जुगारासाठीच खास जागा आहे. दुर्दैवाने पोलिस स्थानक या कालोत्सवाच्या जागेच्या जवळपास ३०० मीटर अंतरावर आहे परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई दिसून येत नाही. अनेक कालोत्सवात भांडणे जुगार खेळताना होत असतात. त्याचबरोबर अनेक जण दारू पिऊन दंगामस्ती करतात. कमला नावाच्या महिलेने "गोवादूत'शी बोलताना सांगितले की या वृत्तपत्राने जुगाराविरोधात अभियान उघडून चांगले काम केले आहे. आज अनेक महिला मंडळे सत्तरी तालुक्यात आहेत. या महिला मंडळांनी खरे म्हणजे राजकारण्यांच्या मागे न धावता जुगारासारख्या घाणेरड्या प्रवृत्ती विरोधात अभियान छेडले पाहिजे. आज राजकारण्यांचे सुध्दा हेच कर्तव्य आहे. सत्तरी तालुका जुगारमुक्त करण्याचे धाडस एकाही राजकारणात नसल्याबद्दल सौ. कमला यांनी खेद व्यक्त केला. दरम्यान ब्रह्माकरमळी सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थानाने याबाबत एक आदर्श निर्माण केला असून या देवस्थानच्या ब्रह्मोत्सवात आजपर्यंत कधीही जुगार चाललेला नाही. त्याचबरोबर याच्यापुढे सुध्दा कोणत्याही परिस्थितीत तेथे जुगाराला थारा दिला जाणार नाही असे देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष संदीप केळकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. जुगाराविरोधात उघडलेल्या अभियानने खऱ्या अर्थाने जुगारविरोधात आवाज बुलंद केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या ब्रह्मकरमळीच्या ब्रह्मोत्सवात कधीही जुगार चालला नाही याचा आदर्श इतर देवस्थानांनी बाळगावा. देवस्थानांसारख्या पवित्र ठिकाणी जुगार चालू नये, असे "गोवादूत'शी बोलताना ऍड. शिवाजी देसाई यांनी सांगितले. देवस्थानला लागणारा पैसा हा पवित्र माध्यमातून जमविलेला असला पाहिजे. कारण देवस्थान म्हणजे पुण्याचे धाम आहे व म्हणूनच या जुगाराला विरोध आहे असे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण केळकर यांनी सांगितले. सत्तरी तालुक्यातील अनेक पंचायत क्षेत्रात हा जुगार जत्रोत्सवावेळी चालत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक पंचायतीने आता जुगाराविरोधात तालुक्यातून ठराव घ्यावा व या अभियानाला साथ देण्याची गरज आहे. दरम्यान "गोवादूत'च्या वृत्ताने सत्तरी तालुक्यातही खळबळ माजली असून सध्या पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पणजीत तरंगत्या बोटीत रोज लाखो रुपयांचा कॅसिनो खेळला जातो. या कॅसिनोला सरकारकडून मान्यता दिली जाते. काही दिवसांपूर्वी एक मंत्रीच कॅसिनो खेळताना प्रत्यक्षरीत्या प्रसार माध्यमांनी दाखविला होता. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे नेते पण कॅसिनोसारख्या वाईट प्रवृत्तींना पाठिंबा देतात, हे आता उघडकीस आले आहे. सरकारने याआधी मटका बंदी केली पण मटका पण सर्रासपणे चालूच आहेतच. म्हणून अशा वाईट प्रवृत्तींवर बंदी घालताना ती बंदी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. जुगार हा खेळ परमेश्वराच्या जत्रेच्या वेळीच का खेळला जातो असाही प्रश्न पडत आहे. पूर्वीच्या जमान्यात जी दशावतारी नाटके गावागावांत व्हायची त्या नाटकांना लोकांची गर्दी होत असे. त्यावेळी लोक देवदर्शन व आवड म्हणून नाटके बघितली जात. आज हे उलट झाले आहे. जत्रेच्या निमित्ताने जुगारासारख्या अनिष्ट प्रथांना प्रथम प्राधान्य दिले जाते. परमेश्वर भक्तीही केवळ दिखाऊपणा झाला आहे. नाटक बघण्यासाठी क्वचित रसिक असतात. खरी गर्दी तर मंदिराच्या मागील बाजूस चालणाऱ्या काळ्या धंद्याकडे असते. यात युवकांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे युवा वर्ग चुकीच्या मार्गाने जाऊ लागला आहे. याचा परिणाम संसारावर होत आहे. या युवकांची कृती बघून बाल युवक पण अशा नादाला लागतात व शिक्षण घेण्याच्या वयात त्यांना जुगारी प्रवृत्तींकडे ओढत चालला आहे. हे सर्व थांबावे असे वाटत असेल तर प्रत्येक देवस्थान कमिटीने याला विरोध करून अभियान सुरू केले पाहिजे,असे मत व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात जुगाराला पूर्ण बंदी आहे. त्याप्रमाणे गोवा राज्यातही जुगारावर बंदी आणून ती प्रत्यक्षात कृतीत आणली पाहिजे. खरेच देवस्थान कमिटींना या मटका जुगाराद्वारे पैसा मिळवण्याची गरज आहे का? आजकाल देवस्थानाला दान करणारे लोक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. अशा दात्यांकडून पैसे घ्यावे जेणे करून पुण्य पदरात पडेल. सत्तरीत दरवर्षी मंदिरांची प्रतिष्ठापना वाढत असून तेवढीच जत्रा भरण्याची संख्याही वाढत आहे. पोलिसांनी खऱ्या अर्थाने अशा जुगार खेळण्यावर कारवाई केली पाहिजे. पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हानच आहे. हे आव्हान स्वीकारतील का, असा प्रश्न सत्तरीतील जनता विचारत आहे.

No comments: