Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 January, 2010

महानंद पुराव्याअभावी दोषमुक्त

सूरत गावकर खून प्रकरण

मडगाव, दि. २ (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी संपूर्ण गोव्यात थैमान माजवलेल्या दुपट्टा खून मालिकेतील पहिल्या खटल्यांतून "सीरियल किलर' म्हणून कुप्रसिद्ध झालेला महानंद नाईक याला आज सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले.
पंचवाडी येथील गाजलेल्या सूरत गावकर खूनप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले आहे. सूरत गावकरचा खून करणे, तिला लुटणे व खुनाचा पुरावा नष्ट करणे असे आरोप त्याच्यावर सरकार पक्षाने ठेवले होते. तथापि, सरकारपक्ष एकही आरोप सिद्ध करण्याइतपत पुरावा सादर करू शकला नाही, असे निकालपत्रात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर सदर मृतदेह सखू गावकर हिच्या बेपत्ता मुलीचा आहे हेही सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. तसेच त्या मृतदेहाची "डीएनए' चाचणीही करण्यात आली नसल्याचे ताशेरे निकालपत्रात मारले आहेत.
फौजदारी सुनावणीत आरोपीविरुध्द सरकार पक्षाने सबळ पुरावे सादर करायला हवेत. मात्र सदर प्रकरणात गुन्ह्यांशीे आरोपीचा संबंध जोडणारा कोणताच पुरावा न्यायालयासमोर आलेला नसून परिस्थितीजन्य पुरावाही आरोपीकडे अंगुलीनिर्देश करीत नाही. मयताच्या अंगावरील खुणांचा संबंध आरोपीशी जोडण्यासही सरकार पक्षाला यश आलेले नाही याकडेही निकालपत्र लक्ष वेधते.
मयताची आई सखू गावकर हिने आपली मुलगी बेपत्ता झाल्यावर लगेच पोलिस तक्रार नोंदवली नाही तसेच ती आरोपीबरोबर गेल्याची तिला कल्पना नव्हती, असे सांगितले. त्याचबरोबर सूरत हिने तेव्हा आपण कुठे व कोणाबरोबर जाते हेही आपल्या आईला सांगितले नव्हते, असे तिच्या आईने दिलेल्या साक्षीवरून स्पष्ट होते .
सूरत गावकरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिला मृत्यू कसा आला तेही उत्तरीय तपासणीत स्पष्ट झालेले नसताना तिचा खून झाला असा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला गेला, तब्बल तीन वर्षांनंतर त्या जागी सापडलेल्या वस्तूंवरून तो मृतदेह त्याच व्यक्तीचा हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढण्यात आला, असे मुद्दे निकालपत्रात उपस्थित करण्यात आले आहेत.
महानंद व सूरत गावकर यांना पर्वताजवळ पारोडा येथे आपण नेऊन सोडले होते, अशी साक्ष देणाऱ्या पिकअप ड्रायव्हरचा उल्लेख निकालपत्रात करण्यात आला आहे. आरोपीस त्याने त्याची छायाचित्रे वृत्तपत्रांत पाहिल्यामुळे ओळखले व म्हणून अशी ओळखपरेड भरवंशाची मानता येणार नाहीत, असे निकालपत्रात म्हटले आहे.
मयताचा खून नेमका कशासाठी झाला याचे कोडे सरकार पक्षाला सोडविता आलेले नाही असा ठपका ठेवताना पारोडा येथे तीन वर्षांपूर्वी सापडलेल्या एका महिलेच्या मृत्यूचे रहस्य सोडविण्यासाठीच आरोपीला या प्रकरणात गुंतवले गेले आहे असे दिसते पण त्यांचा तो प्रयत्न फसलेल्याचे निकालपत्रात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात महानंदच्या कारनाम्यांतील या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले होते. खटल्याच्या निकालासाठी आजची तारीख मुक्रर करण्यात आली होती. या खटल्यात सरकारतर्फे २६ साक्षीदारांची नावे सादर करण्यात आली होती. तथापि महत्वाच्या अशा तीनच साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदवण्यात आल्या होत्या. त्यांत महानंद व सूरतला पर्वतापर्यंत नेऊन सोडणाऱ्या गुरुदास नाईक हा पिकअपवाला, मयताची आई सखू गावकर व केप्याचे पोलिस निरीक्षक नीलेश राणे यांचा समावेश होता.
महानंदच्या वतीने ऍड. जी. आंताव यांनी व सरकारच्या वतीने ऍड. आशा आर्सेकर यांनी या खटल्यात काम पाहिले होते. निकालाप्रत पोहोचलेला हा महानंदवरील पहिला खटला असल्याने सर्वांचेच लक्ष त्याच्या निकालावर खिळून होते.

निर्विकार महानंद
या खटल्याचा निकाल वाचल्यावर न्यायाधीशांनी तुरुंगात असलेल्या महानंदशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारा संपर्क साधला व त्याला या खटल्यांतून निर्दोष मुक्त करण्यात आल्याचे सांगितले. मात्र महानंद निर्विकार उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटले नाहीत.

No comments: