Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 January, 2010

कोण खरा, कोण खोटा!


आग्नेल फर्नांडिस व रवी नाईक यांची जुंपली


पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- राज्यात सर्रास अंमलीपदार्थांचा वापर सुरू असल्यावरून सध्या सरकारातीलच दोन नेत्यांत चांगलीच जुंपली आहे. कॉंग्रेसचे कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस हे उघडपणे अंमलीपदार्थ व वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा सातत्याने आरोप करीत आहेत; तर गृहमंत्री रवी नाईक हा आरोप मानायलाच तयार नाहीत. या दोघांतील कलगीतुऱ्यामुळे खरा कोण आणि खोटा कोण हे स्पष्ट झाले नसले तरी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मात्र अडचणीत आले आहेत.
कांदोळी समुद्र किनाऱ्यावर आयोजित केलेल्या "सनबर्न' पार्टीत अंमलीपदार्थ अतिसेवनामुळे मेहा बहुगुणा या युवतीचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा हा विषय प्रामुख्याने चर्चेला आला आहे. आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी आपण तीन दिवस या पार्टीच्या ठिकाणी गेलो होतो व तेथे उघडपणे दारू आणि अंमलीपदार्थ सेवन केलेले लोक दिसत होते, असे सनसनाटी वक्तव्य केले आहे. गृहमंत्री नाईक मात्र ही गोष्ट खरी नसल्याचे सांगत आहेत. हे राजकीय वक्तव्य आहे व गोव्यात पर्यटकांनी येऊ नये यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. पोलिस तेथे नागरी वेषात लक्ष ठेवून होते. तेथे असा कसलाच प्रकार घडला नाही. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी कितीही बाऊ केला तरी यंदा नवीन वर्षांला पर्यटकांची अलोट गोव्यात लोटली होती. गोव्यावर या लोकांचा पूर्ण विश्वास आहे, असा दावा रवी नाईक यांनी केला. पोलिसांनी चोख व्यवस्था राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे, असा टोलाही नाईक यांनी हाणला. गोवा हे अंमलीपदार्थ तस्करीचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे, अशी भीती अलीकडे वारंवार व्यक्त होत आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून वेळोवेळी अंमलीपदार्थ जप्तही केले जात आहेत. अशा प्रकरणांत अनेकांना अटकही झाली आहे. आतापर्यंत या पथकाच्या हातात केवळ अंमलीपदार्थांची पोहोच करणारे भुरटे लोकच सापडले आहेत; पण या व्यवसायात सामील असलेला एखादी बडी व्यक्ती सापडल्याचे एकही उदाहरण नाही. गृहमंत्री रवी नाईक याप्रकरणी आक्रमक भूमिका का घेत नाहीत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
विधानसभा अधिवेशनात हा विषय आमदार फर्नांडिस यांनी सातत्याने लावून धरला आहे. सरकार त्याकडे गांभीर्यानेही पाहात नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आपल्याबरोबर यावे आपण अड्डे दाखवण्यास तयार आहोत असे जाहीर आव्हान देऊनही गृह खाते चूप बसते, यावरून नेमके पाणी कोठे तरी मुरत असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
अंमलीपदार्थ व्यवसायातही
मंत्र्यांचे बगलबच्चे ?
खाण व्यवसायात विद्यमान सरकारातील बहुसंख्य मंत्री सामील आहेत हे जणू जगजाहीर झाले आहे. तथापि, आता अंमलीपदार्थ व्यवसायातही सरकारातील काही नेत्यांचे बगलबच्चे सामील असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यासंबंधी पोलिस खात्यावर होत असलेल्या आरोपांचे गांभीर्य पाहिले तर पोलिसांनी किनारी भाग पिंजून काढून अंमलीपदार्थ तस्करीचा भांडाफोड करायला हवा होता. प्रत्यक्षात काहीही होत नाही. यात नेमकेकोणत्या नेत्याचे "बच्चे' सहभागी आहेत हे महत्त्वाचे असून आगामी काळात त्याचा पर्दाफाश होईल, असे सांगितले जात आहे. हा विषय विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांच्या कानावर घातलेला आहे. या विषयाकडे राज्यपाल किती गंभीरतेने पाहतात यावरच पुढील कारवाई अवलंबून आहे.

No comments: