Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 January, 2010

हे सरकार बारा मुख्यमंत्र्यांचे


पर्रीकर यांची घणाघाती टीका


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे बारा मुख्यमंत्र्यांचे सरकार आहे की काय, अशीच परिस्थिती ओढवली आहे. प्रत्येक मंत्री स्वतः मुख्यमंत्र्यांच्या तोऱ्यातच वावरत आहे व दिगंबर कामत हे मात्र केवळ नाममात्र मुख्यमंत्री ठरले आहेत. सर्व पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरलेले हे सरकार भगवान भरवसे चालणारे निष्क्रिय व घोटाळेबहाद्दरांचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यासमोरील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. भाजप जनतेचे हे विषय घेऊन सरकारला विधानसभेत व सार्वजनिक ठिकाणीही सडेतोडपणे जाब विचारणार असल्याची माहिती यावेळी पर्रीकर यांनी दिली. या प्रसंगी भाजप विधिमंडळ उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा व आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हजर होते. नोकर भरतीच्या बाबतीत सरकारचे मंत्री युवकांच्या भवितव्याशी खेळत असल्याची टीका यावेळी पर्रीकर यांनी केली. माजी क्रीडामंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या काळात भरती केलेल्या लोकांना त्यांच्या सरकारातीलच विद्यमान क्रीडामंत्री बाबू आजगावकर कामावरून कमी करतात. हाच प्रकार आरोग्य खात्याच्या बाबतीतही झाला. रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना अजूनही झुलवत ठेवले जात आहे व मुख्यमंत्री मात्र हे प्रकार डोळे उघडे ठेवून असह्यपणे पाहत आहेत. सरकारच्या या धोरणाचा भाजप निषेध करीत असल्याचे पर्रीकर म्हणाले.
प्रत्येक विकासकामाची "फाईल' मंत्री मागवून घेतात व विनाकारण आढेवेढे घेऊन पैसे उकळण्याचे प्रकारही सुरू असल्याची टीका त्यांनी केली. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा बोजवारा निघाला आहे. "सायबरएज' योजनेचीही फजिती सुरू आहे. एका सार्वजनिक बांधकाम खात्यात २३६ कोटी रुपयांची थकीत बिले पडून आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडत असल्याने सामान्य लोकांची फरफट सुरू असून या सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही.
"हायसिक्युरिटी' कंत्राट हा महाघोटाळा
हायसिक्युरिटी नंबरप्लेटचे कंत्राट शिमनित उत्च या कंपनीलाच देण्याचा अट्टहास सरकारकडून झाल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल, असे पर्रीकर म्हणाले. या कंत्राटात अनेक भानगडी आहेत व जाणीवपूर्वक इतर कंपन्यांना बाजूला सारून गैरमार्गाने हे कंत्राट मिळवल्याची टीकाही त्यांनी केली.
"हायसिक्युरिटी नंबरप्लेट' हा वाहतूक खाते व कंपनीत झालेला महाघोटाळा असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. कथित अबकारी घोटाळ्यातील मुख्य संशयित अबकारी आयुक्त संदीप जॅकीस हेच त्यावेळी वाहतूक खात्याचे संचालक होते, असेही पर्रीकर म्हणाले. कंपनीतर्फे निविदेसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतही फेरफार करण्यात आले व जुन्या नंबरप्लेट बदलण्यासाठी ४८ टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याची अट टाकणारा अर्ज छुप्या पद्धतीने "फाईल'मध्ये घालण्यात आला. एकीकडे सरकार या संबंधी अभ्यास करण्यासाठी समिती नेमते व ही समिती आपला अहवाल या महिन्याअखेरीस देणार असल्याचे जाहीर करते तर दुसरीकडे राज्याचे ऍडव्होकेट जनरल मात्र आठ दिवसात निर्णय घेऊ अशी बाजू मांडतात. विद्यमान ऍडव्होकेट जनरल यांना सरकारात काय सुरू आहे याचे तरी भान नसावे अन्यथा त्यांनी काहीतरी "फिक्सींग' तरी केले असावे, असा टोलाही यावेळी पर्रीकर यांनी हाणला. कॅसिनो प्रकरण अजूनही न्यायालयात रेंगाळण्यास ऍड. जनरल कारणीभूत असल्याची टीकाही पर्रीकर यांनी केली.
गृहमंत्र्यांना जनताच उत्तर देईल
राज्यात अंमलीपदार्थांचा वापर अजिबात सुरू नाही, असा बेफिकीर व निर्लज्जपणे दावा करणाऱ्या गृहमंत्र्यांना आपण उत्तर देण्याची गरज नाही तर त्यांना आता जनताच काय ते उत्तर देणार, असे पर्रीकर म्हणाले. गृहमंत्र्यांचा हा दावा जनता कितपत मान्य करते हे त्यांना लवकरच समजेल. राज्यात अंमलीपदार्थ व्यवहाराचा उच्छाद सुरू असताना असा दावा करून त्यांनी या सरकारची उरलीसुरली प्रतिष्ठाही वेशीवर टांगली आहे, असेही ते म्हणाले. मडगाव बॉम्बस्फोटाबाबत आपण बोलत नाही असे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांनी सुरुवातीला या स्फोटासाठी वापरलेल्या दुचाकीच्या मालकाचे नाव चुकीचे जाहीर केले याबाबत स्पष्टीकरण दिले काय, असा प्रतिप्रश्न पर्रीकरांनी केला.

No comments: