Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 December, 2009

'उटा'चा हल्लाबोल राजधानीत चक्का जाम, स्वतंत्र खात्याची मागणी मान्य

पणजी दि. १६ (प्रतिनिधी): मांडवी पुलावर शेकडो पोलिसांनी रचलेल्या सुरक्षा रिंगणाचा लक्ष्यभेद करून थेट विधानसभेवर धडक दिलेल्या राज्यातील सुमारे ८ हजार गिरीवासी बांधवांनी आज रौद्ररूप धारण केले. या रौद्ररूपाचे चटके सहन न झाल्याने अखेर कॉंग्रेस सरकारने नमते घेत येत्या दि. १५ जानेवारीपर्यंत आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी आयोग स्थापन करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तीन तास पणजी म्हापसा रोखून धरलेला महामार्ग मोकळा करण्यात आला. परंतु. १५ जानेवारीपर्यंत लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास यापुढे कोणताही मोर्चा नसेल तर, प्रत्यक्ष कृती असेल, असा निर्वाणीचा इशाराही युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन "उटा'ने दिला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून "उटा'ला भेटीसाठी वेळ न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आज मात्र चक्क विधानसभेतून रस्त्यावर चालत येऊन मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले. यावेळी लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या लोकांवर कोणाच्या आदेशावरून पाण्याचा फवारा मारण्यात आला असा प्रश्न करून याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी प्रकाश शं. वेळीप यांनी केली आहे.
यावेळी विधानसभेजवळ आणि दोन्ही मांडवी पुलावर चक्का जाम करण्यात आला होता. दुपारी १२.३०च्या दरम्यान मांडवी पुलावर चक्का जाम करून ठाण मांडलेल्या जमावाला पांगवण्यासाठी "अरुण' या बंबाद्वारे पाण्याचा फवारा मारण्यात आला. परंतु, या बंबाला न जुमानता रौद्ररूप धारण केलेल्या तरुणांनी ""ओसैय....ओसैयच्या'' घोषणा देत शिमगाच घातला. हे चित्र पाहून पोलिसही थक्क झाले. जमाव पांगवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंबांचा या गिरीवासी तरुणांनी एखाद्या धबधब्यावर आंघोळ करीत असल्याचा आनंद लुटला. मात्र, हा आदेश देणारेच न्यायदंडाधिकारी शाबाजी शेटये आणि पोलिस उपअधीक्षक सेराफीन डायस पूर्णपणे भिजले होते.
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री येत नाही तोवर महामार्ग मोकळा केला जाणार नसल्याची भूमिका विधानसभा संकुलासमोरील रस्त्यावर घेतल्याने दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, समाज कल्याण खात्याचे संचालक एन बी. नार्वेकर येऊन विधानसभेच्या समोर रस्त्यावर ठाम मांडून बसलेल्या आंदोलनकर्त्यांकडे चर्चेसाठी आले. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार रमेश तवडकर, गोविंद गावडे, डॉ. दिनेश जल्मी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यापर्यंत आश्वासनाची पूर्तता केली जाणार असल्याचे तोंडी आश्वासन देत कृपा करून रस्ता मोकळा करा, अशी विनवणी केली. यावर "तुमच्या शब्दावरचा विश्वास आमचा उडालेला आहे. आम्हांला लेखी उत्तर द्या' असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगताच दुपारी २. २० वाजता १५ जानेवारीपर्यंत आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी आयोग स्थापन करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तर, येत्या दि. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्याबरोबर होणाऱ्या बैठकीत अन्य १० मागण्यांबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचे "उटा'चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हा तब्बल सहा वर्षाचा संघर्ष आहे. कधीही स्वतःच्या हक्कासाठी पणजीत मोर्चा घेऊन न आलेल्या आणि केवळ डोंगरमाथ्यावर राहून शेतीवाडी करण्याऱ्या बांधवांनी आज विधानसभेच्या दरवाजापर्यंत धडक मारण्याची हिंमत दाखवली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे यावेळी आमदार रमेश तवडकर यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री कामत केवळ पोकळ आश्वासन देत आहेत. त्यामुळेच हा मोर्चा काढणे आम्हांला भाग पडले असल्याचेही ते म्हणाले. या मोर्चात लोक सहभागी होऊ नये यासाठी वाहतूक खात्यामार्फत "आरटीओ'ना आदेश देऊन लोकांना घेऊन येणाऱ्या बसेसना तालांव देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
--------------------------------------------------------------------
२० वर्षांत प्रथमच!
विधानसभा अधिवेशनाच्या काळात १४४ कलमाचे भंग करून आणि मांडवी पुलावर पोलिसातर्फे उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा यंत्रणेचा भेद करून विधानसभेपर्यंत धडक देण्याची मजल गेल्या दोन दशकात कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थेला जमले नाही ते आज अनुसूचित जमातीने करून दाखवले. त्यामुळे हा ऐतिहासिक मोर्चा ठरला असल्याचा दावा या मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.
------------------------------------------------------------------
लोकांची प्रचंड गैरसोय
पणजी शहरात दुपारी १२ नंतर एकही वाहन पुढे किंवा मागे घेता येत नव्हते, एवढी वाहनाची कोंडी झाली होती. पणजीपासून बांबोळी तसेच फोंड्याच्या दिशेने हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. म्हापसा मार्गावरील रांगही फार मोठी होती. दुपारी ३ वाजता मोर्चा संपल्यानंतरही एक तास ही कोंडी फोडण्यात वाहतूक पोलिसांना यश आले नव्हते. दुपारी शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी पणजीच अडकून पडले होते.
-----------------------------------------------------------------------
मनोहर पर्रीकर
मुख्यमंत्र्याचा खोटारडेपणाच या आंदोलनाला आणि चक्का जामला जबाबदार आहे, असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय भारतीय जनता पक्षाने लावून धरला आहे. रमेश तवडकर हे पक्षाच्या आदिवासी विभागाचेे प्रमुख आहेत तसेच ते भाजपचे आमदारही आहेत. त्यामुळे या आंदोलनाला भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे यावेळी श्री. पर्रीकर म्हणाले.
-----------------------------------------------------------------------
संपूर्ण राजधानीत पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. तर, पणजी म्हापसा मार्गावर प्रवासी बसमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी पायी पणजी गाठले. दुपारच्या विमानाने लंडन, अमेरिकेला जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर निघालेल्यांनी आपले विमान पणजीतच राहूनच आकाशातून जाताना पाहिले. पर्वरी, बांबोळी, रायबंदर येथे जाणारे अनेक प्रवासी आपल्या मुलाबाळांना खांद्यावर घेऊन चालत निघाले होते.
-----------------------------------------------------------------
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत पाच रुपये व एक रुपयांचे नाणे त्यांच्या दिशेने फेकून मारण्यात आले. तसेच अनेकांनी पन्नास व शंभराच्या नोटा दाखवून या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
------------------------------------------------------------------
हजारो आंदोलकाने मांडवी पुलावर पोलिसांनी दोन ठिकाणी टाकलेले बॅरेकेट फेकून पर्वरी येथील विधानसभेपर्यंत येताच त्याठिकाणी विधानसभेतून आमदार रमेश तवडकर यांनी त्यांची येऊन भेट घेतली. यावेळी सरकारच्या दुटप्पी आणि खोटारडेपणाचा पाढा वाचताना श्री. तवडकर यांना अश्रू आवरले नाहीत. हे पाहताच, अनेक तरुणांनी आपल्या छातीवर पोलिसांच्या गोळ्या झेलण्याची तयारी दाखवित पोलिसांचे तिसरे कडेही भेदून आतमध्ये जाण्याची तयारी केली. परंतु, आंदोलनाच्या नेत्यांनीच त्यांना तेथेच रोखले.
------------------------------------------------------------

No comments: