Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 December, 2009

निसर्गनियम पाळा व जीवनात सुखी व्हा

वामनराव पै यांचा मौलिक सल्ला

पणजी, दि.१२ (विशेष प्रतिनिधी) - "अंधश्रद्धेच्या पाठी लागून कौल-प्रसाद,उपास तपास,नवस,व्रते वैकल्य करू नका.जीवनात सुखी व्हायचे असेल तर पैसा-एके-पैसा हा जप न करता निसर्गाच्या नियमांचे पालन करा व स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा'' असा मोलाचा उपदेश आज विचारवंत व प्रबोधनकार वामनराव पै यांनी दिला.
जीवन विद्या मिशनतर्फे कला अकादमीत त्यांचे आज "स्त्रियांशी हितगुज' हे खास प्रबोधन आयोजिण्यात आले होते. खुल्या सभागृहातील या भरगच्च कार्यक्रमाला महिला तसेच पुरुषांनीही मोठी उपस्थिती लावली होती.
याप्रसंगी आपल्या कर्तृत्वाने यश मिळविलेल्या लेखिका माधवी देसाई, डॉ.प्रमोद साळगावकर आणि हेमाश्री गडेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एकंदर जीवनाविषयी आपले परखड विचार मांडताना श्री. पै म्हणाले"स्त्री मुक्तीची नव्हे तर स्त्री सन्मानाची आज समाजात जास्त गरज आहे.स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे म्हणून स्त्री सुधारली तर कुटुंब सुधारेल याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. सुशिक्षित आणि सुसंस्कारी स्त्री आपल्या घरकुलात स्वर्ग नांदवू शकते,तर अशिक्षित आणि बिनसंस्कृत स्त्री संसाराला अगदी नरक बनवू शकते'.
जीवन विद्या मिशनच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलताना ते म्हणाले, "जीवन विद्या मिशनचे तत्त्वज्ञान हे निसर्गाच्या नियमांवर भार ठेवते.आपण जीवन जगतो की ते नुसते ढकलत असतो हे प्रत्येकाने बारकाईने तपासले पाहिजे. जीवन जगताना,"आपले ते आपले आणि दुसऱ्याचे तेही आपले'असे समजले तर घराघरांमध्ये भांडण, तंटे, मारामाऱ्या होणारच. असे जगल्याने सुख आपल्या पासून दूर पळते व आपण ते शोधण्यात जन्म वाया घालवितो'.
सुखाविषयीचे आपले मौल्यवान विचार मांडताना ते म्हणाले,"जीवनात सुख हे मानण्यात नाही तर देण्यात आणि वाटण्यात आहे. आनंद वाटा आणि तो लूटा हे सूत्र आचरणात आणले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची मानसिकता बदला. पैसा हेच सर्वस्व नाही, व पैसा हा सुख मिळविण्याचा मार्ग निश्चितच नाही. जगण्यासाठी पैसे हवेत हे जरी सत्य असले तरी ते पूर्णसत्य नव्हे. कारण पैसा जरी दैनंदिन गरजा भागवायला गरजेचा असला तरी तो सुख विकत घेऊ शकत नाही. तुमच्या आसपास पाहा.अनेक मंत्री, भरमसाट पैसा असलेली मंडळी जीवनात खरेच सुखी आहेत काय? एका अर्थाने पाहिल्यास भ्रष्टाचाराचे मूळ स्त्री आहे.म्हणून तुम्ही आपल्या नवऱ्याच्या मागे जास्त अन् जास्त पैसा कमवण्याचा हेका लावू नका. तसे केल्यास वाम मार्गाने घरात येणारा पैसा तुमचे सुख हिरावून नेईल.
वाचन संस्कृती आज लोप पावत आहे याबद्दल वामनरावांनी खेद प्रकट केला.ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, "वाचाल तर वाचाल'. वाचल्याने ज्ञान मिळते व ज्ञानातून अंधश्रद्धा दूर होते.आपल्याला निर्णय घेण्याची भीती वाटते म्हणून आपण सगळे देवाच्या भरवशावर ढकलून मोकळे होतो, हे चुकीचे आहे. तुमच्यामधली शक्ती ओळखा.देवाच्या मर्जीनुसार नव्हे तर निसर्गाच्या नियमानुसार हे जग चालते म्हणून ते नियम काटेकोरपणे पाळणारा सुखी होत आहे.'
या प्रबोधनापूर्वी सन्मानार्थ्यांनी आपले विचार मांडले. शीतल गोरे यांनी जीवन विद्या मिशनची स्थापना व कार्यासंबंधी सांगितले. संगीत अभ्यंकर यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

No comments: