Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 December, 2009

तेलंगणाचा तिढा कायम राजीनामासत्र सुरूच

हैदराबाद, दि. १३ : वेगळ्या तेलंगणा राज्याला विरोध दर्शविण्यासाठी आजपासून तेलगु देसमच्या चार नेत्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यामुळे आणि आमदारांचे राजीनामासत्र सुरूच असल्यामुळे आंध्रात निर्माण झालेले राजकीय संकट शमण्याची सध्यातरी कोणतीही चिन्हे नाहीत.
तेलगु देसमचे आमदार देवीनेनी उमामहेश्वर राव ( मिलावरम) व चिन्नम रामकोटैय्या (नु्रजविदु) यांच्यासह विजयवाडाचे माजी महापौर पंचुमर्थी अनुराधा आणि पक्षाचे एक नेते बी. उमामहेश्वर राव या चार जणांनी आजपासून हे उपोषण विजयवाडा येथे सुरू केले. तर, करीमनगरचे तेलगु देसमचेच आमदार सी. एच. रमेश यांनी आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. तेलंगणाच्या मुद्यावर पक्षाने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
काल रायलसीमा आणि आंध्रच्या किनारपट्टी भागातील २० मंत्र्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. पण, काल मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे. तथापि, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. श्रीनिवास यांनी सांगितले की, कोणताही मंत्री राजीनामा देणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच राजीनामे दिलेल्या आमदारांनी आपले राजीनामे मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केली. त्यांनी हा निर्णय का घेतला हे सर्वांना माहीत आहे आणि आता पक्षश्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील, असे श्रीनिवास म्हणाले.
तेलंगणाला विरोध करण्यासाठी काल खासदारकीचा राजीनामा दिलेले विजयवाडाचे कॉंग्रेस खा.एल. राजगोपाल यांनी म्हटले आहे की, वेगळ्या तेलंगणाचा ठराव विधानसभेत आणला तर आपण बेमुदत उपोषणाला बसू. या ठरावाला २२५ आदारांचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाने आडमुठी भूमिका घेतली तर मग आपणाला तेलंगणाविरोधी आंदोलनात सामील व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
तिकडे तेलंगणातील मंत्री लवकरच एक बैठक घेणार असून आपला निर्णय घोषित करणार आहेत. सर्वात आधी राजीनामा देणारे आमदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांनी केंद्राला आवाहन करताना म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून ज्या शंका आणि गैरसमज निर्माण झाले आहेत, त्या दूर करण्यासाठी हैद्राबादला एक दूत तातडीने पाठविण्यात यावा. त्यामुळे वातावरण शांत होण्यास मदत मिळू शकेल, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वेगळ्या तेलंगणाला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आज चौथ्या दिवशी रायलसीमा आणि किनारपट्टी भागात निदर्शने आणि बेमुदत उपोषण सुरूच आहे. पण, कोणत्याही हिंसक घटनांची नोंद नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आज प्रजा राज्यम पक्षाचे दोन आमदार वाय. श्रीनिवास आणि वाय. रवि यांनी विजयवाडात बेमुदत उपोषण करणाऱ्या तेलगु देसम नेत्यांची भेट घेतली आणि पाठिंबा घोषित केला.

No comments: