महाराष्ट्राचे मंत्री जयंतराव पाटील यांचा विश्वास
म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी) - गोवा राज्यासमोरील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तसेच जनतेच्या विविध प्रश्नांची तड लावण्यावर पक्षाने आगामी काळात भर दिला तर पुढील विधानसभेत तीन आमदारांवरून दहा आमदार विधानसभेत पाठवणे पक्षाला कठीण होणार नाही,असे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.
आज पर्वरी येथे छत्रपती शिवाजी मंदिरात आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोवा प्रदेश अधिवेशनात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस प्रकाश बिनसाळे,गोवा प्रदेश प्रभारी अध्यक्ष कार्मो पेगादो,महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा,पर्यटनमंत्री मिकी पाशेको,आमदार नीळकंठ हळर्णकर,प्रफुल्ल हेदे, प्रा.सुरेंद्र सिरसाट, जितेंद्र देशप्रभू, संगीता परब, प्रकाश फडते,अविनाश भोसले, राजन घाटे आदी पदाधिकारी व नेते हजर होते.
पक्षाची संपूर्ण मदार मंत्री व आमदारांवर आहे.या नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपुलकीने वागवून त्यांच्या कामांकडे लक्ष पुरवावे व पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवावीत,असेही ते म्हणाले.पर्यावरणाचे संतुलन राखून विकास करणे हे पक्षाचे पूर्वीपासूनच धोरण राहिले आहे.गोव्याचा पर्यटन हा मोठा उद्योग आहे तसेच नागरी पुरवठा व महसूल खात्याचा थेट संबंध सामान्य जनतेशी येतो त्यामुळे पक्षाच्या मंत्र्यांनी आपले कार्य जनतेपर्यंत पोहोचवल्यास राष्ट्रवादीचा राज्यात प्रसार व्हायला वेळ लागणार नाही,असेही ते म्हणाले.
आज पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी मंत्री जुझे फिलिप, पर्यटनमंत्री मिकी पाशेको,आमदार नीळकंठ हळर्णकर, जितेंद्र देशप्रभू आदींची भाषणे झाली. याप्रसंगी विविध ठराव संमत करण्यात आले.सूत्रसंचालन सरचिटणीस ऍड.अविनाश भोसले यांनी केले.
राज्य अधिवेशनामध्ये संमत
करण्यात आलेले विविध ठराव
- शरद पवार यांची सतत सहाव्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदन
-जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होणाऱ्या भाववाढीची चिंता, नागरी पुरवठा खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेची व्याप्ती वाढवावी व सामान्य लोकांना दिलासा द्यावा
महिलांना राज्य विधानसभा व संसदेत आरक्षण मिळावे
-राज्यातील विविध खात्यांत अनुसूचित जाती,जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी राखीव पदांवर सर्वसामान्य गटातील उमेदवारांची भरती तात्काळ रद्द करावी व ही चूक केलेल्या खातेप्रमुखांवर कारवाई व्हावी.
-कॉंग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळावा व आघाडीतील समन्वय समितीची बैठक तात्काळ बोलावून आघाडी अंतर्गत विविध विषयांवर तोडगा काढावा
Sunday 13 December, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment