Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 December, 2009

शिक्षण केंद्राच्या नावाखाली कब्रस्तानचा डाव हाणून पाडू

दवर्लीतील ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक
मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): येथील दवर्ली ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या विशेष ग्रामसभेने सरकारच्या नियोजित शिक्षण सुविधा केंद्राला तसेच त्या नावाखाली कब्रस्तान लादण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला व पूर्वजांनी मोठ्या परिश्रमांनी सांभाळून ठेवलेल्या गांवच्या जमिनी तशाच सांभाळून ठेवण्यासाठी प्रसंग आला तर रक्त सांडू असा इशारा दिला.
सदर शिक्षण सुविधा केंद्रासाठी दवर्ली कोमुनिदादीची साधारण ३ लाख चौ. मी. जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केल्यापासून येथील रहिवाशांत असंतोष खदखदत होता त्याचे प्रत्यंतर या खास ग्रामसभेत आले. आज ग्रामसभेला उपस्थितात महिलांचा अधिक भरणा होता व त्यातील अधिकतम वर्गीकृत जमातींतील महिलांनी तर माईकसमोर येऊन वाडवडिलांनी आपल्या लेकरांप्रमाणे सांभाळून ठेवलेल्या व लागवडीखाली आणलेल्या जमिनी सांभाळून ठेेवण्यासाठी प्रसंगी रक्त सांडू, असा इशारा दिला.
हा सगळा भाग वर्गीकृत जमातींचा असून सरकारने त्यांना गृहीत ठेवू नये, हे सगळे लोक काबाडकष्ट करणारे व आपल्या बळावर पुढे जाणारे आहेत, ते सहसा कुणाच्या वाटेला जात नाहीत पण त्याचबरोबर कुणी आपल्या वाटेला आला तर त्याला सहसा सोडत नाहीत हे राजकारणी मंडळीनी विशेषतः मडगावांतील राजकारण्यांनी ध्यानात ठेवावे असे त्यांनी बजावले.
शिक्षण वसाहतीच्या नावाखाली येथील जमीन बड्या शिक्षणसंस्थांना गिळंकृत करू देण्याचा हा डाव आहे असा त्यांनी आरोप केला व मडगावातील दोन शिक्षण संस्थांना त्यांच्या शाखा स्थापन करण्यासाठी दवर्लीमधील जमीन देण्याची गरज नाही, येथे शिक्षण संस्था उभारावयाच्या झाल्या तर येथील स्थानिक लोकच त्या उभारतील व त्यासाठी येथील जमीन सांभाळून ठेवणार आहोत असेही त्यांनी जाहीर केले.
या केंद्राच्या नावाने त्यातील दहा हजार चौ. मी. जमीन कब्रस्तानासाठी देण्याचा सरकारचा डाव उघड झाला असून त्यावरूनही रहिवाशांनी सरकारवर आगपाखड केली व अशा छुप्या मार्गाने येथील लोकांवर कब्रस्तान लादण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याचे तत्काळ व गंभीर परिणाम सरकारला भोेगावे लागतील असा इशारा दिला गेला. गोमंतकीय मुस्लिमांंसाठी येथील दफनभूमी पुरेशी आहे व म्हणून जे वरकडमुस्लिम आहेत त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावात पाठवून तेथे त्यांचे दफन केले जावे,अशी सूचनाही सभेत काहींनी केली.
सरकारने यापूर्वी येथील शेतजमीन संपादन करून येथील लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला व आता शिक्षण केंद्राच्या नावाखाली सरकार दवर्लीवर कब्रस्तान लादू पहात आहे याचे गंभीर परिणाम होतील,असा इशाराही दिला गेला. सरपंच संदीप वेर्लेकर यांनी ग्रामसभेतील ठरावाच्या प्रती लगेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या जातील असे सांगितले.

No comments: