Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 July, 2009

बेपत्ता तपास पथकाचे आज पणजीत उद्घाटन

पणजी, दि.१(प्रतिनिधी)- राज्यातील विविध पोलिस स्थानकांवर बेपत्ता म्हणून नोंद होणाऱ्या प्रकरणांची चौकशी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यरत नसल्याने व महानंद नाईक प्रकरणाद्वारे त्याची आवश्यकता स्पष्ट झाल्याने सरकारने बेपत्ता तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे उद्घाटन गृहमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते उद्या २ जुलै रोजी पणजी येथील महिला व बाल सुरक्षा विभागात करण्यात येणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत विविध पोलिस स्थानकांवर बेपत्ता प्रकरणे नोंद केली जातात. ही प्रकरणे नोंद करण्यासाठी विशेष पोलिसांची सोय केली जात असली तरी तक्रार नोंद झाल्यानंतर बेपत्ता इसमाचा तपास लावण्यासाठी विशेष प्रयत्न मात्र होत नाहीत. बेपत्ता इसमाची माहिती व छायाचित्र सर्व इतर पोलिस स्थानकांवर पाठवल्यानंतर तेथील नोटीस फलकावर ही माहिती लावली जाते. मुळात बेपत्ता झालेल्याचा योग्य पद्धतीने तपास केल्यास ती व्यक्ती कुठे गेली आहे किंवा त्या व्यक्तीबाबत घातपात झाला असेल तर त्याचा सुगावा लागणे शक्य असल्याने आता त्यासाठी बेपत्ता तपास पोलिस पथकाचीच नेमणूक करण्यात आली आहे. फोंडा येथील क्रूरकर्मा महानंद नाईक याचा बळी ठरलेल्या सर्व युवती बेपत्ता असूनही त्यांचा शोध लागू शकला नाही. काही युवतींचे केवळ मृतदेह सापडले असता पोलिसांनी त्यांची नोंद नैसर्गिक मृत्यू म्हणून केली व महानंदाचे बळी वाढत गेले. या सर्व प्रकरणाचा अनुभव पाहता आता हे पथक फक्त अशा प्रकाराची प्रकरणे हाताळणार आहे. या पथकाचे कार्यालय पणजी पोलिस स्थानकाला लागून असलेल्या महिला व बाल सुरक्षा विभाग कार्यालयात उभारण्यात येणार आहे.

No comments: