Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 June, 2009

क्रीडानगरीस विरोधच; शेतकऱ्यांचा निर्धार

प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा

हरमल दि. २८ (प्रतिनिधी) - विकासाच्या नावे सामान्य शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन धारगळमध्ये क्रीडा नगरी उभारण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही व त्यासाठी विरोधाची इतर मार्ग अवलंबतानाच प्रसंगी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यही आम्ही जाऊ असा इशारा, समस्त शेतकरी मंडळींनी आज पुन्हा एकदा दिला. धारगळ क्रीडानगरी समिती व पेडणे तालुका नागरिक मंच आयोजित बैठकीत अनेक पीडित शेतकरी व नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये निमंत्रक नीलेश पटेकर, सुशांत मांद्रेकर, सदानंद वायंगणकर, श्याम धारगळकर, श्रीपाद परब, व्यकंटेश घोडगे, विष्णूदास परब, मोरजीचे माजी सरपंच सतीश शेटगावकर, विलास शेट्ये, प्रशांत गडेकर, अभिमन्यू परब आदी उपस्थित होते. उपस्थित नागरिक व वक्त्यांनी यावेळी क्रीडानगरीस कडाडून विरोध केला. सरकारी अधिकार आणि खोटी कागदपत्रे तयार करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून काही लोकांनी येथे दंडेलशाही सुरू केली आहे, परंतु आपल्या जमीनींच्या संरक्षणार्थ उभी ठाकलेली जनता त्या बधणार नाही, असे वक्त्यांनी ठासून सांगितले. पेडणे तालुक्यातील समस्त नागरिकांनी एकत्र येऊन या क्रीडा नगरीला विरोध करावा व शेती सतेच बागायतींची होणारी हानी टाळावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. काही पंच, सरपंच याबाबतील मूग गिळून गप्प असून त्यांच्या मूकसंमतीनेच ही क्रीडानगरी होत आहे. मात्र क्रीडा नगरी हा केवळ धारगळचाच प्रश्न नसून सगळ्यांच्याच भवितव्याच्या चिंतेचा विषय आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
श्रीपाद परब यांनी सभेत बोलताना सांगितले की, पेडणे तालुक्यात चार ठिकाणी वायंगण शेती आहे. सार्से, पालये, धारगळ व कासारवर्णे विर्नोड येथे पाण्याचा स्त्रोत चांगला आहे. क्रीडा नगरीमुळे पाण्याचा हा स्त्रोत आटून येथील बागायती पुरत्या संपुष्टात येईल व भातशेती कायमची संपून जाईल. असावेळी समस्त शेतकऱ्यांनी आपल्या शेती - भातीच्या रक्षणार्थ मुठी आवळून उभे राहण्याची सध्या वेळ आली असून पेडण्यातील शेतकरी धारगळचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मंत्री बाबू आजगावकर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. क्रीडा नगरी प्रकल्प इतरत्र हलविण्यात गरीब जनता आणि या भागातील शेतकऱ्यांचे हित आहे असे मनोगत अनेक उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी झिला मयेकर, माजी नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस, विष्णू मोरजकर, संतोष महाले यांचीही भाषणे झाली. प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात क्रीडा नगरीला कडाडून विरोध करण्याचे तसेच लोकांच्या छाताडावर बसून स्वतःचा विकास साधू पाहणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले. विठू मोरजकर यांनी क्रीडा नगरी झाल्यास धारगळचा फायदा होण्याऐवजी नुकसानच मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या प्रकल्पाला कडाडून विरोध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपण एक पेडणेकर असल्यास आपणास या शेतकऱ्यांचे दुःख कळते. मात्र मडगाव येथे राहणाऱ्यांना त्याची कळ समजणे शक्य नसल्याचा टोलाही त्यांनी याप्रसंगी हाणला. दाजी परब आदी शेतकऱ्यांनीही याप्रसंगी आपले म्हणणे उपस्थितांसमोर मांडले.

No comments: