Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 15 March, 2009

गोव्याचे वाटोळे रोखण्यासाठी भाजप-मगोने एकत्र येणे गरजेचे

पणजी, दि.१४ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा भाजपशी समविचारी असलेला पक्ष असल्याने या दोन्ही पक्षांच्या मतदारांत विभागणी होऊन त्याचा लाभ कॉंग्रेसला होऊ नये,यासाठीच मगोकडे युतीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दिली.कॉंग्रेस सरकार गोव्याचे वाटोळे करण्यास पुढे सरसावले आहे त्यामुळे गोव्याचे हित जपण्यासाठीच भाजप-मगो एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
भाजपकडून अद्याप अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. तथापि, याबाबत मगो नेत्यांशी संवाद साधण्यात आला आहे..मगोचे असंख्य कार्यकर्ते राज्यात तळागाळात विखुरले आहेत.कॉंग्रेस हा मगो व भाजपचा समान शत्रू असल्याने मतविभाजन टळावे या विचारानेच युतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या युतीच्या विचाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीतून व्हावी व त्यासाठी मगोने आपला पाठिंबा भाजपला द्यावा,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले
गेल्यावेळी मगो पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात होता, परंतु त्यांना जादा मते मिळू शकली नाहीत.मगो स्वबळावर निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच असल्याने हे वास्तव त्यांना मान्य करावे लागले. मगोला कितीही मते मिळाली तरी या मतांना खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त व्हावे व कॉंग्रेसविरोधी या मतांचे योग्य प्रकारे मूल्य राखले जावे, असे ते म्हणाले.
दरम्यान,भाजपने मगोशी युती करण्याचा निर्णय गोव्याचे हित नजरेसमोर ठेवूनच घेतला आहे. सद्यस्थिती कॉंग्रेस सरकारकडून गोव्याचे कसे वाटोळे सुरू आहे याची जाणीव सगळ्यांना असल्याने सर्व मतभेद विसरून आता समविचारी पक्षानी एकत्र आल्यास कॉंग्रेसचा पाडावा करणे सहज शक्य आहे. लवकरच या प्रकरणी मगो पक्षाशी अधिकृत चर्चा करणार असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.

No comments: