वास्को, दि. १९ (प्रतिनिधी): खराब वातावरणामुळे नियंत्रणाबाहेर गेलेली "एमव्ही नूर ४' ही बार्ज आज संध्याकाळी एमपीटीच्या धक्का क्रमांक ९ समोर समुद्रात बुडाली. अब्दुल करीम (केजीएन ओर कॅरिअर्स) यांच्या मालकीच्या या बार्जमध्ये यावेळी सुमारे १०६५ टनाच्या आसपास खनिज माल असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आज संध्याकाळी ५.३० च्या आसपास कोठंबी, सावर्डे येथून खनिज माल भरून एमपीटी धक्क्याच्या दिशेने येत असलेली बार्ज खराब वातावरणात सापडली. माल उतरवण्यासाठी सदर बार्ज धक्का क्र. ९ जवळ पोहोचली असता भयंकर लाटांमुळे पाणी आत शिरले. एका बाजूने कलंडलेली बार्ज हळूहळू पूर्णपणे पाण्यात बुडाली. यावेळी बार्जमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. बार्जमधील सुमारे २० टन माल वाचवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बार्जमालक अब्दुल करीम (मडगावकर) यांनी बार्जमध्ये सुमारे ७० ते ८० लाखांचा माल होता असे सांगून एक कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राम आसरे यांनी एमपीटीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्याची माहिती दिली. बार्ज बुडण्याचे नेमके कारण काय आहे, यासंदर्भात पोलिस तपास सुरू आहे.
Friday 20 March, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment