Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 November, 2008

कामत सरकार बरखास्त करा, भाजपचे राज्यपालांना निवेदन

निवेदनात म्हटले आहे...
प्रशासन पूर्णपणे ठप्प
राज्यात घटनात्मक पेच
मंत्र्यांमध्ये सुंदोपसुंदी
जनतेते अस्वस्थता

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सर्व पातळीवर पूर्ण अपयशी ठरले असून कायदा सुव्यवस्था व प्रशासन ठप्प झाले आहे. मंत्रिमंडळ सदस्य एकमेकांविरोधात भांडण्यातच व्यस्त असल्याने राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ही स्थिती कायम राहिल्यास राज्याचा सत्यानाश अटळ आहे. त्यामुळे राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी तात्काळ हे सरकार बरखास्त करण्याची केंद्राला शिफारस करावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षातर्फे आज करण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, अन्य पदाधिकारी व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यासह पक्षाचे १४ आमदार यांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनवर राज्यपाल एस. एस. सिद्धू यांची भेट घेतली. संध्याकाळी भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकाराअंतर्गत सुरू असलेल्या अनेक भानगडी तसेच विविध विषयांची सखोल माहिती राज्यपालांना देण्यात आली. त्यांना काही कागदपत्रेही सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपालांनी या सर्व माहितीची शहनिशा करून हा अहवाल केंद्राला सादर करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
सरकार बरखास्तीनंतर निवडणुकीला सामोरे जाण्यास भाजप पूर्ण सज्ज असल्याचा दावा श्री.नाईक यांनी केला. मुळातच मंत्रिमंडळामध्ये एकवाक्यता असणे गरजेचे असताना विद्यमान मंत्री एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. एका मंत्र्याने तर आपल्याच सहकाऱ्यांवर अपात्रतेची याचिका सभापतींसमोर सादर केली आहे. काही मंत्री उघडपणे प्रसिद्धी माध्यमांसमोर आपल्याच सरकारवर टीका करीत सुटले आहेत. हा उबग आणणारा प्रकार असून ही सरळ जनतेची क्रूर थट्टा असल्याचा आरोपही श्री.नाईक यांनी केला. "सेझ'प्रकरणी सरकारची संशयास्पद भूमिका, मेगा प्रकल्पांविरोधात उभे राहिलेले जनआंदोलन, खराब रस्ते, महागाई आदी प्रकरणांवरून लोक वारंवार रस्त्यावर येत असून कोणत्याही विषयावर तोडगा निघत नसल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. राज्यपालांनी आता हस्तक्षेप करण्याची नितांत गरज असून हे सरकार बडतर्फ करून जनतेला दिलासा द्यावा,असेही या निवेदनात म्हटले आहे.
राज्यात विविध ठिकाणी मूर्तिभंजन व मंदिर तोडफोड प्रकरणे वाढत चालली आहेत. याबाबत चौकशी किंवा गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने त्याचा परिणाम समाजात तणाव निर्माण होण्यात बनला असून २० ऑक्टोबर रोजी पूर्णपणे गोवा बंद यशस्वी करून जनतेने आपला रोष प्रकट केल्याचेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. मोतीडोंगर येथे तलवारींचा साठा सापडल्यानंतर राज्यात घडलेले विविध प्रकार,अल्पवयीन विदेशी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मंत्र्यांची मुले व नातेवाइकांची घेण्यात येणारी नावे आदींमुळे राज्याची मोठ्याप्रमाणात बदनामी होत असून पोलिसांवर राजकीय दबाव वाढत चालला आहे, असे श्री.नाईक म्हणाले.
ऍड.आयरिश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एका मंत्र्याचा हात असल्याची चर्चा जरी असली तरी या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचतात,असा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडून संबंधितांना अभय मिळत असल्यानेच हे प्रकार घडतात, असा आरोपही पर्रीकर यांनी केला.

No comments: