Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 31 October, 2008

आसाममध्ये १५ मिनिटांत १३ बॉम्बस्फोट

६४ ठार, ३०० पेक्षा जास्त जखमी, राज्यात रेड अलर्ट
गुवाहाटीत ६ स्फोट; संचारबंदी लागू
बाजारांनाच बनविले लक्ष्य, हुजी व उल्फावर संशय
हात नसल्याचा उल्फाचा खुलासा
दहशतवादापासून एकतेला धोका : पंतप्रधान
डॉ. मनमोहनसिंग आज गुवाहाटीत
केंद्रीय गृह मंत्रालयाची चमूही भेट देणार
आसामची सीमा सील

गुवाहाटी, दि.३० : आज अवघ्या १५ मिनिटांमध्ये एकामागोमाग झालेल्या १३ बॉम्बस्फोटांनी संपूर्ण आसाम हादरले. या बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत ६४ लोक ठार झाले असून, ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जिहादी गटाने हे बॉम्बस्फोट घडवून आणले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत असून, उल्फाने मात्र या स्फोटांमध्ये हात नसल्याचा खुलासा केला आहे. संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसामची सीमाही सील करण्यात आली असून, राजधानी गुवाहाटीमध्ये दुपारी तीनपासून सचारबंदी लागू करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत झालेल्या या स्फोटांमध्ये निरपराध लोक मारले गेल्याने आसामच्या जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. स्फोटांनंतर रस्त्यावर उतरून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. सर्व स्फोट हे बाजारांमध्ये, म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी घडविण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील, गृहमंत्री शिवराज पाटील, लोकसभतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी या घटनेचा निषेध केला असून, पंतप्रधान उद्या गुवाहाटीला भेट देणार आहेत. दहशतवादामुळे देशाच्या एकतेलाच धोका निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावून एक पथक आसामला रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे.
जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जखमींना गुवाहाटीतील विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दिवाळी असल्यामुळे बाजारांमध्ये गर्दी होती आणि ते हेरूनच अतिरेक्यांनी बाजारांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
सकाळी साडेअकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. आसाम विधानसभा आणि सचिवालयाला लागून असलेल्या आणि अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागाच्या शेजारी असलेल्या गणेशगुडी भागातील भाजी बाजारात पहिला शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटामुळे बाजारात मोठी आग लागली आणि सर्वत्र धूर पसरला आणि हाहाकार झाला, असे गुवाहाटीचे पोलिस अधीक्षक जी. पी. सिंग यांनी सांगितले. दुसरा शक्तिशाली स्फोट जिल्हा न्यायालय परिसरात झाला. दिवाळीच्या सुटीनंतर आज न्यायालयाच्या कामकाजाचा पहिलाच दिवस होता आणि परिसरात वकील व त्यांच्या अशिलांची गर्दी होती. अचानक मोठा स्फोट झाला आणि त्याठिकाणी पार्क करण्यात आलेल्या अनेक वाहनांच्या यात चिंधड्या उडाल्या. यात अनेक जण ठार झाले, तर अनेक जखमी झाले. तिसरा स्फोट फॅन्सी बाजार या अतिशय गर्दीच्या ठिकाणी झाला. यात अनेक जण जखमी झाले. स्फोटानंतर प्रचंड धावपळ झाली, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. गुवाहाटीत झालेल्या एकूण ६ स्फोटांमध्ये ३० जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
गुवाहाटीपाठोपाठ आसामच्या बांदीपुरा, कोक्राझार, बोंगईगाव आणि बारपेटा या शहरांमध्येही बॉम्बस्फोट घडविण्यात आले. कोक्राझार येथे दुचाकी वाहनात स्फोटके ठेवण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले. बारपेटा जिल्ह्यात तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत, तर बोगईगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. कोक्रझार जिल्ह्यातही दोन ठिकाणी स्फोट झाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने आसाम सरकारनडून तातडीने अहवाल मागविला असून, गृहसचिव मधुकर गुप्ता हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे गृहमंत्रालयाच्या सूत्राने सांगितले.
गुवाहाटीच्या एका भागात झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जबरदस्त होती की, एक बस अर्ध्यापेक्षा जास्त जळाली आणि त्यातील जखमींना बाहेर काढून आम्ही रुग्णालयात भरती केले, असे पंकज गोस्वामी या प्रत्यक्षर्दीने सांगितले.
स्फोटांनतर संतप्त झालेल्या गुवाहाटीतील लोकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. स्फोटांमुळे जिथे आग लागली होती, ती विझवायला निघालेल्या अग्निशमन दलाच्या बंबांवरही संतप्त जमावाने जोरदार दगडफेक केली. एवढेच काय तर घटनास्थळाहून जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चाललेल्या रुग्णवाहिकांवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांशी झालेल्या संघर्षात १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला.

No comments: