Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 October, 2008

महागाईचे चटके सोसत दिवाळीचे राज्यात स्वागत

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - महागाईने शिखर गाठले असले तरी कर्ज काढून सण साजरे करण्याच्या भाविकांच्या वृत्तीचा प्रत्यय दिवाळीनिमित्त राज्यात येत आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे कोणत्याही वस्तूंच्या किमतीवर नागरी पुरवठा व दर नियंत्रण खात्याचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे दर भडकले आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या मिठाईच्या किलोने नेहमीची किंमत पार केली असून वाढीव किंमत आता दोनशेच्या आसपास पोचली आहे. तिखट पदार्थ आता शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. भाज्यांनी तर कहर केला आहे. कांदे, बटाटे यांचे दरही वीसच्या आसपास पोचले आहेत. टॉमेटोचा दर चाळीसवर गेल्याने सामान्य माणसाला आता परवडेनासे झाले आहेत. कडधान्ये, साखर, गहू, मैदा या आवश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. खाद्यतेलाने शंभरी पार केली आहे. सध्या कोणत्याही ब्रॅंडचे तेल शंभर रुपयाखाली लीटर मिळत नाही. अशा स्थितीत एकदोन हजार रुपयांतही एका दिवसाची दिवाळी होत नाही, अशी खंत सामान्य माणूस व्यक्त करीत आहे. उपाहारगृहातील वस्तूंचे दरही अचानक वाढले असून, काही हॉटेलांमध्ये भजी, बटाटेवडे यांचे आकार लहान करण्यात आले आहेत. केवळ भाजीपाव व चहाचे बिल किमान २० ते २५ रुपये दिले जाते. अलीकडे फळाच्या रसाकडे लोकांचा कल असल्याचे दिसून आल्याने काही ठिकाणी असा रस पुरविला जात असला तरी त्यांच्या किमती मात्र अव्वाच्यासव्वा आकारल्या जातात.
एका बाजूला सामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला असतानाच, नरकारसुर प्रतिमा तयार करण्यावर मात्र युवावर्गाने हजारो रुपये खर्च केल्याचे दिसून आले. नरकासुर प्रतिमा स्पर्धांमुळे तर वेगवेगळ्या गटांमध्ये चुरस निर्माण झाल्याने खर्चाचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसून आले.

No comments: